समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती मार्गाचा शासन निर्णय जारी ; नांदेड,परभणी, हिंगोली,जिल्ह्यांना फायदा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा शासन निर्णय शेअर केला आहे.आपल्या ट्विटमध्ये चव्हाण म्हणतात, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी झाला आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून संपूर्ण सहकार्य केले. या प्रकल्पाचा नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांना मोठा लाभ होईल.
प्रवाशांकरिता मुंबई ते नागपूर हा १६ तासांचे अंतर केवळ ८ तासांवर आणण्यासाठी मुंबई ते नागपुर हा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प मे 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. भविष्यात याच मार्गावरून जालना ते नांदेड असा प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्ग जालना ते नांदेड असा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प तयार झाल्यास एकीकडे मुंबई ते नागपूर तर दुसरीकडे मुंबई ते नांदेड आणि जालना ते नांदेड प्रवास सुकर आणि सुपरफास्ट होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा प्रकल्प ठरणार आहे.