मानवी मूल्यांच्या पेरणीसाठी राजकारणात युवकांनी सक्रिय होणे हि काळाची गरज :- खासदार हेमंत पाटील…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :-
मानव विकास व मानवी मूल्यांच्या पेरणीसाठी युवकांनी राजकारणात सक्रिय राहणे हि काळाची गरज आहे ,असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी दिल्ली येथे झालेल्या युवा गौरव पुरस्कार कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केले.
देशभरात मानव विकासाच्या विविध क्षेत्रातील १२ युवकांना आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे
भारत गौरव युवा पुरस्कार-२०२१ ने सन्मानित करण्यात आले . या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. भारत गौरव फाउंडेशन दिल्ली च्या वतीने दरवर्षी या पुरस्काराने नवोदित उद्यमशील युवकांचा सन्मान केला जातो. विविध क्षेत्रातील विशेषज्ञ तथा सनदी अधिका-यांच्या निवड समिती कडून अशा पुरस्कारार्थींची निवड केली जाते. या वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातून खासदार श्रीकांत शिंदे आणि विशाल भुजबळ यांना केंद्रीय मंत्री कौशल किशोर, केंद्रीय मंत्री फग्गुन सिंग कुलस्ते, खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते विजेत्या युवकांना गौरविण्यात आले. यावेळी देशभरातून १२ खासदारांसह सत्कारमूर्ती तथा ईथियोपियाचे राजदूत यांची विशेष उपस्थिती होती. खासदार हेमंत पाटील यांनी पानिपत १७६१ च्या युध्दातील मराठा सेनानीच्या योगदानाचा संदर्भ देऊन देशभरातून आलेल्या उपस्थितींना महाराष्ट्राचे भारतासाठीच्या योगदानाने परिचित करून दिले. ते पुढे म्हणाले की, युवशक्ती ही कोणत्याही देशासमोरील समग्र अडचणींवरचे सक्षम ऊर्जास्रोत आहे. या युवा शक्तीचा विधायक वापर केल्यास ती युवाशक्ती त्या देशाला तारू शकते, ग्रामीण भारतीयांना विकासासाठी सहकारीता आधारीत उद्योग फायदेशीर व कमी जोखमीचे माध्यम आहे. जो देश युवाशक्तीला नशामुक्त जीवन देतो तो देश ख-या अर्थाने महासत्ता असतो. भारताने, महिला, शेतकरी , आणि सैनिकांचा सन्मान करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचे ,राष्ट्रमाता जिजाऊ, त्यागमूर्ती येसूबाई साहेबांचे चरित्र आपल्या युवक युवतींपुढे ठेवले तर भारत निश्चितच शोषणमुक्त मानव जीवन व सक्षम भारत बनू शकतो.
कार्यक्रमाला राष्ट्रीय मराठा मिशनचे अध्यक्ष कमलेश पाटील, गोदावरी समूहाच्या तथा महाराष्ट्र राज्य महिला उद्योजक विकास परिषदेच्या अध्यक्षा राजश्री पाटील,भारत बोधीसत्व परिषदेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र मडके, पानिपत विजय महोत्सव समितीचे कमलजीत महल्ले, सक्षम भारत युवा प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय अध्यक्ष अमील पाटील वेळुकर, महासचिव अमरशेठ हरले, यावेळी उपस्थित होते . विशेष निमंत्रित ईथियोपियाचे राजदूतांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.