कुणी ग्रामसेवक दाखवता का हो , ग्रामवासीयांच्या आर्त टाहो ; कोरोना महामारीत अनेक ग्रामसेवकांची मुख्यालयाला दांडी , गोर सेनेचा आंदोलनाचा इशारा…
कुणी ग्रामसेवक दाखवता का हो , ग्रामवासीयांच्या आर्त टाहो ; कोरोना महामारीत अनेक ग्रामसेवकांची मुख्यालयाला दांडी , गोर सेनेचा आंदोलनाचा इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकीरण देशमुख) :- सध्या राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलेले असतांना ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याची मुख्य जबाबदारी असलेला प्रशासनातील महत्वाचा घटक असलेला प्रशासनातील ग्रामपातळीवर काम करणारी ग्रामसेवक मंडळी मुख्यालयाला दांडी मारत पसार झाली असल्याने नागरिकांना ग्रामसेवक मिळणे दुरापास्त बनले असल्याने “ कुणी ग्रामसेवक दाखवता का हो असा नटसम्राट चित्रपटातील गणपतराव बेलवलकर नटसम्राटा सारखा आर्त टाहो ग्रामीण भागातील जनता फोडतांना दिसत असल्याने गोर सेने च्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर यांना एक निवेदन सादर करून ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे आदेश द्या व ग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक प्रणाली पूर्ववत सुरु करा अशी मागणी केली आहे. सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने काही गावात पाणीटंचाईने नागरिकांना जीव गमवावा लागण्याची पाळी आली असून नुकत्याच आनमाळ येथे एका वृद्धेचा मृत्यू झाला परंतु कोरोना महामारीच्या अनुशंगाने असलेली संचारबंदी असल्याने याबाबत फार अशी चर्चा झाली नाही हा भाग अलहिदा !
सध्या राज्यात कोरोना महामारीचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोना महामारीचा राज्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेस खबरदारीच्या उपाययोजना आखण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.
ग्रामपातळीवर कोरोना विषयक उपाययोजना सुरु असलेल्या लसीकरणाबाबत जणजागृती करण्याचे व ग्रामीण भागातील जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने ग्रामसेवक या प्रशासनातील ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यावर असते परंतु तालुक्यातील अनेक ग्रामसेवक या परिस्थितीचे भान न ठेवता मुख्यालयाला दांडी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिक ग्रामसेवकांना भेटण्यासाठी तालुका स्तरावर आले असता तिथेही सदरील महाशय त्यांना भेटत नाही तसेच त्यांचे भ्रमणध्वनी सुद्धा बंद असतात त्यामुळे आलेल्या नागरिकांना ग्रामसेवकांची भेट न होताच परत जावे लागत आहे. अनेक ग्रामसेवक मंडळी जिल्ह्याच्या ठिकाणी व किनवट, पुसद, यवतमाळ आदी मोठ्या शहरात राहून आठ दिवसात एकदा मुख्यालयास भेट देत कर्तव्याची औपचारिकता पार पाडत असल्याने ग्रामीण भागात कोरोना उपयायोजनांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व कोरोना प्रसार रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक मंडळीना मुख्यालयी हजर राहण्याबाबत आदेशित करावे व प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाया करण्यात याव्या अन्यथा कोरोना नियमांच्या अधीन राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव, तालुका उपाध्यक्ष उकंड पवार, कोषाध्यक्ष कुणाल राठोड, आदीसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.