राज्य सरकारच्या नाकर्तेपणाला डिफेंड करणं हेच शरद पवारांचं काम : फडणवीस
फडणवीस तीन दिवसांच्या पहाणी दौऱ्यावर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्र सरकारचा नाकर्तेपणा समोर आला असून सरकारचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम शरद पवार यांना उरलं आहे, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तुळजापूरमधील गव्हर्न्मेंट सर्किट हाउस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री घरातून का काम करतात यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं. त्यावरच बोलताना फडणवीस यांनी पवार फक्त सरकारचा बचाव करण्याचं काम करत असल्याचा टोला लगावला आहे. फडणवीस हे बारामतीमधील उंडवडी गावातील पहाणी करण्यासाठी गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको आहे. राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद यावर वाद करत बसण्याची ही वेळ नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. “सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. शेतकरी एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये आहे. तुमचे राज्यपालांसोबत जे काही मतभेद असतील ते चालत राहतील. याच्या पूर्वीही असं झालं आहे. आम्ही देखील हे पाहिलं आहे. राज्यपालांबरोबर यापूर्वीही मतभेद झालेत. त्यामुळे आता तो विषय नसून शेतकऱ्याला काय मदत मिळणार हे महत्वाचं आहे,” असं फडणवीस म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काम करा आम्ही सदस्य म्हणून बाहेर जाऊन काम करु असं पवारांनी म्हटल्याचं सांगत यासंदर्भातील प्रतिक्रिया फडणवीस यांना पत्रकारांनी विचारली. “पवारांना या सरकारचा बचाव करावा लागत आहे. या सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येतोय. त्यामुळे असंतोष तयार झालेला आहे. त्यामुळे रोज या सरकारचा बचाव करणं एवढचं काम पवारांकडे आहे,” असं फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारचे अनेक पालकमंत्री आमचा दौरा घोषित झाल्यानंतर जनतेच्या भेटीला गेले. या सरकारने आमचे दौरे घोषित झाल्यानंतर दौऱ्यांचा कार्यक्रम जाहीर केला अशी टीकाही फडणवीस यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी करताना पंचनाम्यांची वाट बघत बसू नये असंही फडणवीस म्हणाले.