प्रवासासाठी ई पासची अट हास्यास्पद -देवेंद्र फडणवीस
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई: खासगी गाड्यांतून प्रवासासाठी ई पासची अट कायम ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाष्य केलं. ‘ई पासचं औचित्यच आता संपलंय. लोक मीम्स आणि व्यंग बनवू लागलेत,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी सरकारला टोला हाणला. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी विधान भवनात मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील ‘अनलॉक’बाबत सरकारचे निर्णय गोंधळाचे आणि विसंगतीपूर्ण आहेत. टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या अनलॉकच्या संदर्भात केंद्र सरकारनं काही निर्णय लागू केले आहेत.
इतर राज्यांनी हे निर्णय लागू केले आहेत. मात्र, महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मग तो प्रवासाचा मुद्दा असेल किंवा अन्य मुद्दे असतील. लोक एसटीनं जाऊ शकतात पण खासगी गाडीनं जायचं असल्यास ई पास काढावा लागतो. यावर आता मीम्स, व्यंग केले जात आहे,’ हे फडणवीसांनी निदर्शनास आणलं