भाजपला काँग्रेसच्या नेत्यांची गरज का? हर्षवर्धन सपकाळ, संस्था वाचविण्यासाठी जगतापांनी पक्ष सोडला….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपचे नेते करतात. तरीदेखील धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते-नेते यांना घेण्याची गरज पडते आहे.
भाजप हा चेटकिणीचा पक्ष आहे,” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी भाजपवर टीका केली. जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला म्हणून कोणी जात नाही, तर स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी जातात, अशी प्रतिक्रिया संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशावर त्यांनी दिली.
पुरंदरचे माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. बैठकीपूर्वी सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली, मग तिथे जिल्हाध्यक्षांचे काय घेऊन बसलात, असा टोलाही त्यांनी लगाविला.
काँग्रेस देशातील सर्वाधिक जुना आहे. या पक्षाने देशाला राज्यघटना दिली. मात्र भाजप मतदारांची चोरी करून सत्तेत बसलेला पक्ष आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत आणि ते त्यांच्या नेत्यांना मोठेही करत नाही; मात्र अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धाक दाखवून ते स्वतः पक्षात घेत आहेत. काँग्रेस हा नेत्यांचा नव्हे तर विचारांचा पक्ष आहे, असेही सपकाळ म्हणाले.
राज्यातील महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसून घाशीराम कोतवाल राज्य चालवत आहेत, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली. काही मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्याच्या प्रकाराची एसआ़टी चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण दडपू नये, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात धमकाविण्याचे प्रकार
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांची भेट घेतली. त्यावर सपकाळ म्हणाले, ”वैचारिक मांडणी करणाऱ्यांना धमकाविणे, त्यांना घाबरविणे हाच प्रकार सध्या सुरू आहे. गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागे महसूलमंत्री असल्याने राज्यात काय सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे. मात्र भाजपचे हे कारस्थान लोकांपर्यंत पोहोचवून वैचारिक क्रांती केली जाईल आणि त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.”