“महिना झाला, पहलगामचे हल्लेखोर कुठे आहेत?” प्रकाश आंबेडकरांचा मोदींना प्रश्न; म्हणाले, “कसला जल्लोष.”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गेल्या महिन्यात, २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.
या घटनेतून देश सावरण्याचा प्रयत्न करतोय. तर, देशातील सर्व तपास यंत्रणा गेल्या महिनाभरापासून पहलगाममधील हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप चारपैकी एकही हल्लेखोर सापडलेला नाही. हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितलं होतं की २२ एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दोन पाकिस्तानी नागरिक आणि दोन काश्मिरी रहिवाशांचा सहभाग आहे.
केंद्र सरकारने पहलगाम हल्ला व हल्लेखोरांना पकडण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेवर (एनआयए) सोपवली आहे. भारतीय तपास यंत्रणांचा असा अंदाज आहे की, दहशतवादी अजूनही त्याच भागात आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या तपासातून नक्की काय माहिती समोर आली? दहशतवाद्यांना पकडणे आव्हानात्मक का ठरत आहे? हल्ल्यात सहभागी असणारे दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारताच्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार
या हल्ल्यानंतर भारतीय वायूदलासह लष्कराने पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत वायूदलाने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करून हे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले, काही क्षेपणास्रं डागली. त्याच्या प्रत्युत्तरात भारतानेही पाकिस्तानवर क्षेपणास्र हल्ला केला. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटलं होतं. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चांनंतर दोन्ही देशांनी युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय लष्कराचे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवरील हल्ले, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा अनेकांनी जल्लोष केला. मात्र, जिथून या सगळ्याची सुरूवात झाली त्या पहलगाम हल्ल्य्यातील दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे की “पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? हल्लेखोर पकडले गेले नाहीत, मग तुम्ही जल्लोष कसला करताय?”
प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की “मोदी, पहलगाम हल्ल्यास जबाबदार दहशतवादी कुठे आहेत? त्या घटनेला जवळपास एक महिना उलटला आहे. तुम्ही नेमका कसला जल्लोष करत आहात? त्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांच्या पत्नी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अजून न्याय मिळालेला नाही.”