पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, फोटो दाखवत सोफिया कुरेशींनी पाकला उघडं पाडलं…!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पाकिस्तानला उघड पाडलंय.पाकिस्तानच्या सैन्याकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. 7 मेला ड्रोन हल्ला केला.
पाकिस्तानकडून भटींडा स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो निष्क्रिय करण्यात आला. जम्मू काश्मिरच्या विविध भागात गोळीबारी केली. यात काही भारतीय जवान शहीद झाले तर नागरिकांनाही प्राण गमवावा लागल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ऑपरेशन सिंदूरला 2 दिवस पूर्ण झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या दोन दिवसांच्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स शेअर केल्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने हे प्रयत्न हाणून पाडल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नल सोफिया कुरेशी काय म्हणाल्या?
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. पण भारतातील कोणत्याही लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, याचा पुनरुच्चार आज करण्यात आला. 7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेड काउंटर ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे हल्ले हाणून पाडण्यात आले. त्यांचे अवशेष अनेक ठिकाणांहून सापडले, जे पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज सकाळी भारतीय सैन्याने अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताचा प्रतिसादही सारखाच, त्याच क्षेत्रात आणि त्याच तीव्रतेने होता. लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबाराची तीव्रता वाढवलीय. कुपवाडा, मेंढर, बारामुल्ला, उरी, पूंछ आणि राजौरी येथे मोर्टार आणि जड तोफखान्याचा वापर केला जात असल्याची माहिती कर्नल सोफिया यांनी दिली.
विक्रम मिश्री काय म्हणाले?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. ‘ही मालिका 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यापासून सुरू झाली. भारताने काल त्यांच्या कारवाईला प्रत्युत्तर दिलंय. पहलगाम हल्ल्यावर प्रेस स्टेटमेंट जारी करण्याच्या प्रकरणावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा होत होती. तेव्हा टीआरएफचा उल्लेख करण्यास विरोध केला गेला. टीआरएफ ही तीच संघटना होती ज्याने एकदा नव्हे तर दोनदा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.