जिल्ह्यात पुन्हा 40 जण पॉझेटिव्ह ; 1 मृत्यू ; 8 जन कोरोनामुक्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यात आज (दि.23) पुन्हा 40 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर पूसद शहरातील श्रीरामपूर येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 8 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 25 पुरुष व 15 महिला आहे. यात दिग्रस येथील पाच पुरूष व तीन महिला, पुसद येथील पार्वतीनगरातील एक महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरूष, पांढरवकडा येथील अकरा पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक पुरूष, यवतमाळ येथील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरूष व पाच महिला, तर आर्णी येथील एक पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत 187 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात 40 जणांची भर पडल्याने हा आकडा 227 वर पोहचला. तर पुसद येथील 1 महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आल्याने ही संख्या 228 होऊन परत 227 झाली होती. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 8 जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 219 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 144 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 75 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 689 झाली आहे. यापैकी 448 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 22 मृत्युची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 40 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 10978 नमुने पाठविले असून यापैकी 10557 प्राप्त तर 421 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 9868 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.