…तर भाजप-ठाकरे यांच्यात नवी प्रेम कहाणी सुरू होईल, बच्चू कडू यांचं महत्त्वाचं वक्तव्य….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. आधी मुख्यमंत्री पद, नंतर मंत्रीमंडळ आणि आता पालकमंत्रीपदावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.
निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. अशात एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट बॅकफुटला गेले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गटात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याला कारण ठरतायत मिलिंद नार्वेकर यांचे ट्वीट.
गतकाळात ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर भाजपसोबत जवळीक वाढवताना दिसत आहेत. ते युती जोडो अभियान चालवत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर 28 नोव्हेंबरला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलं होतं. फडणवीसांनी सीएम पदाची शपथ घेतल्यानंतरबी शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नव्हे तर अलीकडेच वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर मिलिद नार्वेकर यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं होतं. ठाकरे गटाचे निकटवर्तीय असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची ही भूमिका पाहता, ठाकरे गट आणि भाजप आगामी काळात एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा सुरू आहेत.
या सगळ्यावर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रेमभंग झाला, तर राज्यात भाजप आणि ठाकरे गटात नवीन प्रेम कहाणी सुरू होऊ शकते, असं वक्तव्य कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कडूंनी हे वक्तव्य केलं आहे.
भाजप ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचा प्रेमभंग झाला, तर उद्धव ठाकरेंसोबत भाजपची नवीन प्रेमाची कहाणी सुरू होऊ शकते. त्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल. मोठ्या माशांखाली लहान मासे असतात, ते मोठ्या माशाला कुरतडून खात असतात. पण एक दिवस असा येतो की हा मोठा मासा लहान माशांना पूर्ण नष्ट करतो, अशी भाजपची एकंदरीत रणनीती आहे. या निवडणुकीत विरोधक तर खल्लास झाले. पण मित्र पक्ष देखील केवळ दिसायला युतीत आहेत. पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या अंतर्मनाला विचारलं, तर त्यांचं भाजपबद्दल अंतर्मन काय आहे, हे लक्षात येईल. यांची नार्को टेस्ट झाली, तर भाजपबद्दल त्यांच्या मनात काय आहे, हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे नक्की सांगतील.”