“नवनीत राणा यांचा पराभूत झाल्याचा महाराष्ट्राला आनंद” ; बच्चू कडू यांनी भाजपाला डिवचले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवासाठी आमदार रवी राणा हेच कारणीभूत आहेत. त्यांची अरेरावीची वर्तणूक, प्रत्येकासोबत वाद यामुळे अनेकांची नाराजी ओढवून घेतली होती.
काही जण आपल्या कर्मामुळेही पराभूत होतात. त्याचे हे एक मोठे उदाहरण आहे. नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे, असा टोला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, माझ्यासारख्या व्यक्तीला घरात येऊन मारू, अशी धमकी आमदार रवी राणा यांनी दिली होती. त्यांची आणि आपली मैत्री होऊच शकत नव्हती. त्यांच्या विरोधात वातावरण होते, अशा स्थितीत दिनेश बुब यांच्यासारखा कार्यकर्ता आम्हाला मिळाला.
या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही शेतकरी, शेतमजुरांचेही प्रश्न मांडले. दुहेरी, तिहेरी उद्देशाने आम्ही ही निवडणूक लढलो. आता या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला, त्यांना पराभूत करणे, हा आमचा हेतू होताच. पण, आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली. नरेंद्र मोदी यांच्या बाजूचाही मतप्रवाह होता आणि मोदींच्या विरोधातला देखील मतप्रवाह होता. अशा परिस्थितीत आमचा उमेदवार मागे पडला. या जाती धर्माच्या लढाईत शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न मागे पडणार, असे आम्ही सांगितले होते आणि तसेच झाले.
बच्चू कडू म्हणाले, राणा दाम्पत्याची वर्तणूक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली, ती कुणालाच आवडली नाही. हनुमान चालिसा पठनाचे प्रकरण किंवा कुठल्याही कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. भाजपचे सगळे पदाधिकारी हे राणा दाम्पत्याच्या विरोधात होते. नवनीत राणा यांना वगळून कुणालाही उमेदवारी द्या, अशी आग्रही मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच केली होती. भाजपमधून त्यांना विरोध होता. अनेक मुद्दे एकत्रित होऊन त्यांचा पराजय झाला आहे.
या अमरावती जिल्ह्यात चांगल्या हेतूने लोकांनी परिवर्तन केले. बळवंत वानखडे निवडून आले. रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा.सू. गवई यांच्यानंतर प्रथमच बौद्ध खासदार अमरावती जिल्ह्याला मिळाला आहे, त्याचा आपल्याला आनंद आहे.
रवी राणा यांना पराभूत करणे हे पुढील लक्ष्य राहणार का, या प्रश्नाच्या उत्तरात बच्चू कडू म्हणाले, आम्ही व्यक्तिगत कुणालाही लक्ष्य करीत नाही. आगामी काळात कशा पद्धतीची समीकरणे तयार होतात, हे पहावे लागेल. परिस्थिती पाहून समोर जाऊ. रवी राणा आणि आमची मैत्री कधीच होऊ शकत नाही. नैतिकतेचा, विचारधारेचा प्रश्न आहे. या बाबतीत आमचे पटूच शकत नाही. केवळ पराभूत करण्यासाठीच बच्चू कडू आहे, असे नाही.
निवडणुकीच्या प्रचारात प्रहार जनशक्ती पक्ष आघाडीवर होता. पण, कॉंग्रेसला बौद्ध आणि मुस्लीम यांच्या मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ मिळाला. भाजपला हिंदुत्वाच्या मुद्यावर मते मिळाली, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..