बंजारा समाजाच्या प्रश्नासाठी सरसावले नवनिर्वाचित आमदार राजेश राठोड
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधापरिषदेतील कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश राठोड यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर भटके विमुक्त आणि बंजारा समाजाच्या प्रश्नाला हात घातला आहे. महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव असलेल्या राठोड यांनी नुकतीच लोकसभेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा प्रभारी महाराष्ट्र, खासदार मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली व अनुसूचित जातीचे आरक्षण, तसेच राज्यातील भटके विमुक्त जाती जमाती ओबीसी समाजावर लादण्यात आलेली क्रिमीलेयरची अट रद्द करण्या संदर्भात चर्चा केली.
राजेश राठोड यांची गेल्या महिन्यात विधान परिषदेवर कॉंग्रेसकडून बिनविरोध निवड करण्यात आली. राठोड हे माजी आमदार धोडीराम राठोड यांचे पुत्र आहेत.गेली अनेक वर्ष ते कॉंग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील भटके विमुक्त जाती जमाती, बंजारा समाजासाठी ते काम करत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते परतूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होते, पण तेव्हा पक्षश्रेष्ठींनी त्यांना थांबण्यास सांगितले. पंरतु सहा महिन्यातच पक्षाने राजेश राठोड यांना विधान परिषदेवर संधी देत त्यांना दिलेला शब्द पाळला.
राजेश राठोड यांनी नुकतीच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व नव्याने राज्यसभेवर कॉंग्रेसने पुन्हा संधी दिलेले मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. खासदार झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन करतांनाच राठोड यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन देखील दिले.
या निवेदनात प्रामुख्याने महाराष्ट्रातील भटके विमुक्त जाती जमाती, ओबीसी समाजाला लावलेली क्रिमीलेयरची जाचक अट रद्द करा, तसेच कर्नाटकातील बंजारा, लबानी समाजाला असलेले अनुसूचित जातीसाठी एससीटेचे आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकातील विधान परिषद सदस्य प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.