शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंचीही घोषणा, मुंबईतील उमेदवार जाहीर…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची शरद पवारांकडून घोषणा करण्यात आली असतानाच, महाविकास आघाडीतील आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. जुहू येथील कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, स्वतः उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित करून टाकला आहे. ‘अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचा आहे,’ असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
संजय निरुपम यांचे काय होणार?
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना 5 लाख 70 हजार 063 मते मिळाली होती. तर, काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम 3 लाख 9 हजार 735 मते मिळाली होती. त्यामुळे कीर्तिकर यांचा विजय झाला होता. मात्र, यंदा महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे संजय निरुपम याचं काय होणार अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे जागावाटपादरम्यान काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता अशीही चर्चा आहे.
2019 चा निकाल?
गजानन किर्तीकर (शिवसेना) : 570,063 (60.55 टक्के)
संजय निरुपम (काँग्रेस) : 3,09,73 (32.90 टक्के)
सुरेश शेट्टी (वंचित) 23,367 (2.49 टक्के)
नोटा : 18,225 (1.94 टक्के)
मतदारसंघ राजकीय इतिहास
मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिल्यास या मतदारसंघात शिवसेना-भाजपचे वर्चस्व पाहायला मिळते. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे आमदार या लोकसभा मतदारसंघात आहेत. 2009 मध्ये या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांचा 38,387 मतांनी पराभव केला होता. पुढे 2014 मध्ये मोदी लाटेत गजानन कीर्तिकर यांचा विजय झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा कीर्तिकर यांनी बाजी मारली आणि आपले मताधिक्यात देखील मोठी वाढ केली. दरम्यान, शिवसेनेत दोन गट झाले. मात्र, कीर्तिकर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिले आणि त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे.