विलगीकरणातील लोकांच्या जेवणात अळ्या तर एकच पंखा कुलररही नाही ; महापालिकेने नागरिकांना वाऱ्यावर सोडले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर।
व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस आणि पाचपावलीतील विलगीकरणातील लोकांना अतिशय सुमार दर्जाचे जेवण व वागणूक मिळत आहे. व्हीएनआयटीमध्ये तर चक्क जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेने या लोकांना विलगीकरणात आणल्यानंतर जणू वाऱ्यावर सोडून दिले आहे. यामुळे येथील नागरिक संतापले असून त्यांनी महापालिकेच्या नावाने शिमगा केला.आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्?हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलीस क्वार्टर, प्रोझोन चिंचभवन आदी ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना ठेवण्यात आले आहे. आरोग्यासह भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षेबाबत काळजी घेत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र येथे रोजचे जेवण सुद्धा चांगले मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. कॅटरिंगवाल्याचा करार संपला आहे. त्यामुळे विविध धार्मिक व सामाजिक संस्थांकडून जेवण येत आहे. त्याचा दर्जा सुमार आहे. सिम्बॉयसिसमध्ये गड्डीगोदाम व गोळीबार येथील अनेक लोक विलगीकरणासाठी असून त्यातील अनेक जण चांगल्या घरचे आहेत. मात्र त्यांना मिळणारे जेवण व वागणूक खूपच वाईट आहे. पाचपावलीतील पोलीस क्वार्टर येथे तर मंगळवारी सायंकाळी लोकांनी चांगले जेवण मिळत नसल्यामुळे प्रशासनावर राग व्यक्त करत उपाशी राहण्याचा निर्णय घेतला. व्हीएनआयटीमध्ये एका इमारतीमध्ये १५० लोक आहेत आणि २ स्वच्छता गृह आहेत. त्यामुळे अनेकांची अडचण होऊ लागली आहे.
जे मिळाले तेच खा.
व्हीएनआयटी येथील केंद्रात देण्यात आलेल्या जेवणामध्ये अळ्या आढळून आल्या. त्यामुळे लोकांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असता जे मिळाले ते खा, असा संतापजनक सल्ला त्यांना देण्यात आला. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त करत आम्ही भिकारी किंवा जनावर नाही असे सांगत जेवण न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रभागातील नगरसेवक व आमदारांना तक्रार केली मात्र त्यांचे महापालिका प्रशासन ऐकत नाही.
एकच पंखा, कुलरही नाही
उन्हाचा तडाखा वाढत असताना पाचपावलीतील अनेक खोल्यांमध्ये केवळ एक पंखा आहे. कुलरही नाही. बाहेर निघाले तर पोलीस जबरदस्तीने खोल्यांमध्ये डांबतात. या केंद्रात आणण्यापेक्षा आमच्या घरीच विलगीकरण करून राहतो, अशी विनंती नागरिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे करीत आहेत. पण, त्यांचे कुणीच ऐकत नाही.