शेतकरी संकटात : पाकिस्तानातून विदर्भात पोहचली टोळधाड; संत्रा, मोसंबी भाजीपाला केला फस्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्रातील शेतकरी सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण पाकिस्तानातून मध्य प्रदेशात आणि आता अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात टोळधाड आली आहे. ही टोळधाड पाणी आणि पीक असल्याने स्थिरावली. यादरम्यान संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला फस्त केला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी हिरव्यागार असलेल्या शेतांत मंगळवारी फक्त काळी माती तेवढी उरली होती.
‘टोळ’ हा एक नाकतोडा प्रजातीचा उपद्रवी किटक आहे. तो हिरवी पाने खातो. याचं तोंड घोड्यासारखं असल्यानं त्याला विदर्भात ‘घोड्या’ असंही म्हटलं जातं.करोनाच्या संकटात उद्ध्वस्त झालेल्या नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर या संकटातून सावरण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे.मध्य प्रदेशातून वरूड, मोर्शी तालुक्यात आलेली टोळधाड शिंगोरी, पाळा, भिवकुंडी, सालबर्डी, घोडदेव, भाईपूरमध्ये पसरली. सोमवारी रात्री याच परिसरात होती. या काळात त्यांनी अंडी दिल्यास नव्या किड्यांचा जन्म होऊन धोका दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे
यावर्षी भारतात टोळधाडीचा पहिला हल्ला 11 एप्रिल रोजी राजस्थानातल्या गंगानगरमध्ये झाला होता. यानंतर केंद्र सरकारच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने आणखी एका टोळधाडीचा इशारा दिला होता. हे टोळ पाकिस्तानातून भारतात दाखल झाले होते. जयपूर आणि आसपासच्या परिसरातही या टोळधाडींनी पिकांचं मोठं नुकसान केलं.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (25 मे) जयपूर शहरातल्या काही रहिवासी भागातही ही टोळधाड दिसली. दरम्यान, 26 वर्षानंतर येणाऱ्या या संकटामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण, टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते.