कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिले जाईल :- दादा भुसे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कष्ट करणारे अनेक मराठा समाजाचे कुटुंब आहेत. त्यांची परिस्थिती खालावली आहे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या गोरगरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही मागणी होती.
त्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
कुणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीत ओबीसीत बसेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करत कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाईल, असेही भुसे यांनी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. २७) शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी भुसे बोलत होते.
भुसे म्हणाले, की २३ जानेवारी हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस, तर २७ जानेवारी हा धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांचा जन्मदिवस आहे. हे दोन्ही दिवस शिवसैनिक उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करतात. आज नाशिकमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचे पूजन करून हा दिवस साजरा केला जात आहे.
या दिवसाचे औचित्य साधून गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे-पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. त्याची यशस्वी सांगता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या गोरगरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही मागणी होती. त्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे त्यांनी सांगितले.