“ओबीसींसाठी नवा पक्ष उभारू” ; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आंदोलनाला आज यश आले. त्यांनी केलेल्या विविध मागण्या राज्य सरकराने मान्य केल्या. त्यानंतर वाशीतूनच मराठा आंदोलक माघारी फिरले.
असे असतानाच ओबीसींच्या आंदोलनाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय दिला जाईल असे म्हटले जात होते. दरम्यान आजच्या अध्यादेशानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडेगे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. तर ओबीसींवर अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठी नवा पक्ष उभारू असेही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आंदोलन तुर्तास स्थगित केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओबीसींवर अन्याय केल्या जाणार नसल्याचे म्हणाले. ते म्हणाले की, आरक्षण देण्याचा मार्ग हा कायद्यानेच काढावा लागेल हे आधीपासूनच सांगत होतो. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरसकट करता येत नाही, परंतु जे रक्ताच्या नात्यातील आहेत. त्यांना ते देता येईल. त्या संदर्भात संविधानात देखील तरतूद असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून या अडचणी दूर करण्यात आल्या. यामुळे मराठा समाजाचा एका मोठा प्रश्न सुटणार आहे. तर ओबीसी बांधवांमध्ये भीती होती की, त्यांच्यावर अन्याय होईल. परंतु तसे काही केले नाही. कारण, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होईल याची दक्षता घेण्यात आली आहे अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान याआधी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांपुढे येत म्हणाले की, सरकारने काढलेला अध्यादेश नसून तो केवळ एक मसूदा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, ओबीसींवर अन्याय होतोय की मराठ्यांना फसवलं जातंय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आणि झूंडशाहीने कायदा नियम बदलता येत नाहीत असेही ते म्हणाले.
फडणवीसांचा ओबीसी डीएनए शांत का?
सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या अध्यादेशाची आम्ही होळी करु, असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहे. आम्ही आदेशाची होळी करू. राज्यभर आक्रोश आंदोलन करू असे म्हणत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, सगळ्यात मोठी फसवणूक ओबीसी समाजाची झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. आमचं आरक्षण लुटलं. सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ओबीसी डीएनए का शांत आहे? सगळ्या पक्षांनी ओबीसी सेल बरखास्त करावं, असं आवाहन प्रकाश शेंडगे यांनी केलं.