पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसाचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत कोकण, विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सध्या राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे.
अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेला आहे.
सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या मध्यापासूनच राज्यावर पावसाचे ढग दिसतील. आठवडाअखेरीस या प्रणालीला वेग येणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, पावसामुळे हवेत गारवा राहण्याचा अंदाज आहे.
सध्या राज्यात कुठे ऊन, कुठे थंडी तर कुठे पाऊस असे हवामान तयार झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार असली तरी विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मार्चपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (११२ टक्के) पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने थंडी कमी राहणार आहे. मध्य भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
२०२३ ठरले दुसरे उष्ण वर्ष
यंदाचे वर्ष हे ०.६३ अंशांनी दुसरे अधिक उष्ण वर्ष ठरले आहे. यापूर्वी २०१६ हे वर्ष ०.७१ अंश अधिक तापमानाची नोंद होत पहिले उष्ण वर्ष ठरले होते.