पणन’करणार जुन्याच निकषाने खरेदी ; २५ क्विटंल मर्यादा नको
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
एक शेतकरी एक वाहन हा नियम मान्य असला तरी केवळ २५ क्विटंलची मर्यादा नको, असे स्पष्ट करीत पणन जुन्या नियमाप्रमाणेच कापसची खरेदी करणार आहे. अशा सूचना पणनने कापूस खरेदी सुरू असलेल्या केंद्रावरील ग्रेडरला दिल्या आहेत. शेतकरी संघर्ष समितीने प्रशासनाने घातलेली अट मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनामुळे खरीप हंगाम तोंडावर आल्यानंतरही कापूस खरेदीला वेग आलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत अडकला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी पणन महासंघ तसेच सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केली. सोशल डिस्टन्सिंग राहावे, यासाठी दररोज केवळ वीस वाहनांची मोजणी केली जाते. काही ठिकाणी ही संख्या वाढविण्यात आली आहे.मात्र, दोन दिवसापूर्वी जिल्हा प्रशासनाने एक शेतकरी, एक वाहन २५ क्विटंल कापसाची मर्यादा दिली होती.
यावर पणन महासंघाने तसे न करता एक शेतकरी, एक वाहन ही अट मान्य केली आहे. मात्र, २५ क्विटंल कापसाऐवजी वाहनात येईल, तेवढा कापूस खरेदी करणार आहे. जिल्ह्यातील बाजार समितीत दोन ते तीन हजार शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. शेतकऱ्यांना एकाच वेळी कापूस विकता यावा, यासाठी पणनने केवळ चार चाकी वाहनच बंधनकारक केले आहे.
या वाहनात येईल तेवढा कापूस घेण्याचे धोरण पणनचे आहे. यामुळे आता प्रशासनाचे एक शेतकरी एक वाहन ही अट जरी पणनने मान्य केली, असली तरी क्विटंलच्या मर्यादेवरून नकार देत शेतकऱ्यांचा येईल. तेवढा कापूस घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकरी संघर्ष समितीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांची भेट घेत अट अन्यायकारक असल्याचे नमूद केले आहे. यावेळी प्रवीण देशमुख, अशोकराव बोबडे, अरुण राऊत, मनीष पाटील, वसंतराव घुईखेडकर, सुरेश चिंचोळकर, अनिल गायकवाड, आनंदराव जगताप आदी उपस्थित होते.