औरंगाबाद लोकसभेसाठी पुन्हा खैरे,जलील अन् हर्षवर्धन जाधवांच्या नावाची चर्चा ; भाजपकडूनही तयारी सुरू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहे. अशातच राज्यातील काही चर्चेतील लोकसभा मतदारसंघात आत्तापासूनच इच्छुकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ज्यात मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा देखील समावेश आहे. गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यामुळे यंदाही संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण याच मतदारसंघात एमआयएम पक्षाचे राज्यातील एकमेव आणि पहिले खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले होते. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील जलील यांच्यासह पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे , हर्षवर्धन जाधव मैदानात असण्याची शक्यता आहे. सोबतच भाजपकडून देखील औरंगाबादमध्ये उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असून, यासाठी पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.
कसे असणार चित्र..!
राज्याच्या राजकारणात औरंगाबाद जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये याच औरंगाबाद जिल्ह्यातील तीन आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत. तर दोन जण केंद्रीय मंत्री आहेत. एवढेच नाही तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील औरंगाबाद जिल्ह्याचेच आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना-भाजप युतीत ही जागा सेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून (शिंदे गट) रोहियो मंत्री संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर गेल्यावेळी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले हर्षवर्धन जाधव हे बीआरएस पक्षाकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी असल्याने आणि त्यात ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून उमेदवार न देण्याचा निर्णय होऊ शकतो. पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळे सद्या फक्त अंदाज आणि शक्यता वर्तवली जाऊ शकते.
भाजप- शिवसेनेत जागा कुणाला मिळणार
शिवसेना-भाजप युतीत आत्तापर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच असायचा. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने सलग चार वेळा या मतदारसंघावर शिवसेनेने विजयाचा भगवा फडकवला होता. परंतु, यावेळी शिवसेनेचे बंडखोरी झाल्याने, दोन्ही शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि भाजपची युती आहे. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपकडून देखील उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे ऐनवेळी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाला मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्यावेळी कोणाला किती मतदान
इम्तियाज जलील (एमआयएम- वंचित बहुजन)
मतदान: 389042 (32.47 टक्के)
चंद्रकांत खैरे ( शिवसेना, आत्ताचे ठाकरे गट)
मतदान: 384550 (32.09 टक्के)
हर्षवर्धन जाधव (अपक्ष)
मतदान: 283798 (23.68 टक्के)
सुभाष झांबड (कॉंग्रेस)
मतदान: 91789 (7.66 टक्के)