मणिपूरचा मुद्दा मोदींसाठी महत्त्वाचा नाही, PM देशाबाहेर असताना सर्वपक्षीय बैठक ; राहुल गांधींची टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीवर सवाल उपस्थित केला आहे.
मणिपुरच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 24 जून रोजी दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. यासंदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी माहिती देण्यात आली.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी ट्विट करत या बैठकीवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जेव्हा पंतप्रधान देशात नाहीत तेव्हा ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे यावरुन हे स्पष्ट होतं की, पंतप्रधानांसाठी ही बैठक महत्त्वाची नाही.’ असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर देखील टीका केली आहे.
सर्वपक्षीय प्रतिनिधींना मणिपूरला पाठवण्याची मागणी
राहुल गांधी यांनी एका आठवड्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधींना मणिपूरला पाठवण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. 15 जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं की, ‘भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणामुळे मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी भारताला अपयशी केले आहे आणि आता ते यावर मौन बाळगून आहेत. या हिंसाचाराला थांबवण्यासाठी आणि मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधींचे मंडळ मणिपूर पाठवण्यात यावे.’ ‘द्वेषाचे दुकान बंद करुन प्रेमाचे दुकान सुरु करुया’, असं म्हणत राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया
मणिपूरच्या स्थितीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील या बैठकीवर टीका केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, ‘बऱ्याच काळापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. हे पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. असं म्हणत त्यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ‘
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या सत्रात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमध्ये मेतई आणि कुकी या दोन समाजामध्ये जातीय दंगली सुरु आहेत. सध्या मणिपूरमध्ये जाळपोळ, दंगल यांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये यावर काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.