सावरकर यांचा अपमान करणं हा देखील देशद्रोहच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांना चांगलच फटकारलं. त्यातही मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला चांगलच फैलावर घेतलं.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणं हा देखील देशद्रोहच आहे. त्यामुळे सावरकरांचा अपमान करू नका. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. विधानसभेत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केल्यावरूनही त्यांनी विरोधकांना फटकारलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह बोलणं हा देखील देशाचा अपमान आहे. गेली आठ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून गद्दार म्हणणं. खोके म्हणणं, चोर म्हणणं हे कोणत्या आचारसंहितेत बसतं? आम्ही कालच्या जोडो मारो आंदोलनाचं समर्थन केलं नाही. पण सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देखील देशद्रोहाचं काम आहे. यात एकच सांगतो, जेव्हा दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे तीन बोटे असतात. सभागृहाचं पावित्र्य जपलं पाहिजे. या सभागृहात मोठमोठी माणसं होती. या सभागृहात आणि बाहेर कोणतंही चुकीचं वर्तन होता कामा नये. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असा घेऊ नका, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला.
तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान उंचावली आहे. जगभर देशाचा मान वाढवला आहे. मी व्यक्ती म्हणून बोलत नाही. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आम्हीच काय या देशातील जनताही सहन करणार नाही. जी -20चं अध्यक्षपद आपल्याला मिळालं. तिथे तुमचे नेते काय म्हणाले, लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात होती तर लोकशाहीत भारतजोडो यात्रा कशी काढली? तिरंगा फडकवायला गेले तेव्हा लोकशाही नव्हती? तुमच्या नेत्याबद्दल आम्ही कधीच अपमानास्पद बोललो नाही. इंदिरा गांधींचा आम्ही मान राखतो. तुम्ही जर पंतप्रधानांविरोधात बोलत असाल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
सर्वांवरच कारवाई करा
या पुढे सर्वांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. या सदनाचा मान राखला पाहिजे. या विधान भवनाच्या कॅम्पसमध्ये तुम्ही आठ महिने आमच्याविरोधात घोषणा देत होते. तेव्हा कसं चाललं? आठ महिने आमच्या लोकांचा अपमान झाला. आमच्या विरोधात बोललं गेलं. आता जर कारवाई करायची असेल तर सर्वांवरच केली पाहिजे, असंही ते म्हणाले.
त्यांना तुम्ही चोर म्हणता?
मोदींच्या आईचं दु:खद निधन झालं. अंत्यविधी झाल्यावर ते कर्तव्यावर गेले त्यांना तुम्ही चोर म्हणता? ज्यांच्या नसानसात देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती पेरलीय त्यांना तुम्ही चोर म्हणताय? हे बिलकूल चालणार नाही. खपवून घेणार नाही. जे चुकीचं आहे. त्याविरोधात आम्ही बोलतच राहणार, असंही ते म्हणाले.