दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय…! प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.
राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे प्रकार चालायचे. दुसरीकडे पेपर सुरु झाल्यानंतर काही शिक्षक विद्यार्थ्यांना पासिंगपुरते वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगतात. हे अनुचित प्रकार कायमचे बंद व्हावेत, हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बोर्डाने परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ केली आहे.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर मिळेल, पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या ‘रनर’वरील जबाबदारी वाढविली आहे. कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे.
तसेच परीक्षा केंद्रांवर पोचल्यावर वेळोवेळी ‘रनर’ला त्यांच्याकडील मोबाइल किंवा कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. तत्पूर्वी, बोर्ड परीक्षेला कॉपी करणे गुन्हा आहे, कॉपी केल्यास काय शिक्षा होऊ शकते, पेपर पारदर्शक व प्रामाणिकपणे कसा सोडवायचा, याचे धडे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात द्यायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटामागे देखील त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
दहावी-बारावी परीक्षेची स्थिती
एकूण विद्यार्थी
३२ लाख
एकूण परीक्षा केंद्रे
८०००
बारावीचा पहिला पेपर
२१ फेब्रुवारी
दहावीचा पहिला पेपर
२ मार्च
‘रनर’कडे व्हिडिओ रेकॉर्डिंगची जबाबदारी
दहावी-बारावीची परीक्षा यंदा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकांची देखील भरारी पथके नेमली जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या ‘रनर’ला कस्टडीतून निघल्यापासून केंद्रावर पोचेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. तसेच केंद्र संचालकांना सिलबंद पॉकिट देताना व दालनात प्रश्नपत्रिका वाटप करतानाही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी.
प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेत लिहण्याचा असावा सराव
कॉपी केल्यास होईल कारवाई; ऑबजेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे सांगितली जाणार नाहीत
पेपर सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोचा
संपूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जा; कशाचाही मनावर नसावा तणाव