“सरकारला पाठिंबा दिला म्हणजे आम्ही.”, शिंदे-फडणवीस सरकारविरोधात बच्चू कडूंची थेट भूमिका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जानेवारी रोजी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत.
आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाचही जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, “आम्हाला पाचही जागा लढवायच्या आहेत, असं आम्ही आमच्या बैठकीत ठरवलं आहे. कोकण, अमरावती, मराठवाडा, नागपूर आणि नाशिक येथील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या जागांबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा करत आहोत.”
“याआधीही आम्ही सगळी माहिती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दिली होती. आम्ही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या पाचपैकी किमान एक-दोन जागा आम्हाला सोडाव्यात,” अशी मागणी बच्चू कडूंनी केली.
बच्चू कडू पुढे म्हणाले, “सरकारला पाठिंबा दिला म्हणजे तुम्ही नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवावी, असं परिपत्रक काढलं नव्हतं. याबाबत आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनीच यावर तोडगा काढावा. आम्हाला मराठवाड्यातील किमान एकतरी जागा मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे,” असंही बच्चू कडू म्हणाले.