बच्चू कडूंनी वाढवले शिंदे-फडणवीसांचे टेन्शन ; घेतला मोठा निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजप आणि शिंदे गटाचे टेन्शन वाढवले आहे.
निवडणुकीत त्यांनी पाचही उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने (BJP) जय्यत तयारी केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रहार शिक्षक संघटना व महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था संघटनेचे (मेस्टा) पाचही विभागाचे उमेदवार जाहीर केले. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदार संघात भाजप-शिंदे गटाच्या विरोधात प्रहार पक्षाने भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. ३० जानेवारीला पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक होणार आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघासाठी किरण चौधरी, मराठवाडा औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून डॉ. संजय तायडे, कोकण विभागातून नरेश कोंडा आणि नाशिक विभागातून प्रा. सुभाष जंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये प्रहारचे दोन तर मेस्टाचे तीन उमेदवार उभे आहेत.
या उमेदवारांना स्वाभिमानी शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, महात्मा फुले शिक्षक परिषद, मराठा क्रांती मोर्चा, शिक्षक समन्वय संघ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ या संघाटनांनी पाठिंबा दिल्याचा दावा, प्रहारच्या वतीने केला जात आहे. २०१७ मध्ये अमरावती पदवीधर मतदार संघात डॉ. दीपक धोटे यांनी प्रहारतर्फे लढत दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
गेल्या तीन वर्षांपासून या पाचही मतदार संघांमध्ये प्रहारने तयारी केली होती. मतदार नोंदणीतही सहभाग घेतला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना माहिती देण्यात आली होती. सत्तारूढ आघाडीचे उमेदवार देताना प्रहारचे मत विचारात घ्यावे, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र, त्यांच्याकडून निरोप न आल्याने आम्ही उमेदवार जाहीर केले असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे, असे बच्चू कडू यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणटले होते.
दरम्यान, दुसरीकडे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने संयुक्त उमेदवार उभे केल आहेत. त्यामध्ये आज भारती जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन उमेदवारांची घोषणा केली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यामध्ये कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून रणजीत पाटील यांना तर मराठवाडा शिक्षक मतदार संघातून किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.