एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटावर कुरघोडी…? जोगेंद्र कवाडेंसोबत युती होणार, तारीख अन् वेळ ठरली….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एककीडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाची युतीची चर्चा सुरू आहे. या युतीवर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही. मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महापालिका निवडणूक युतीत लढणार असल्याचे सांगितले.
मात्र, यावर ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. असं असतानाच आता दलित समाजातील मोठे नेते, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची युती ठरली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आधी दलित पँथर आणि आता कवाडे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत असतानाच त्याआधी बाळासाहेबांची शिवेसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षांची युती उद्या जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची उद्या संयुक्त पत्रकार परीषद मुंबईत बाळासाहेब भवनात होणार आहे. या पत्रकार परीषदेत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र युतीची अधिकृत घोषणा होणार.
कवाडे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली.
या भेटीत भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्यावर चर्चा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी या युतीला सकारात्मक प्रतिसादही दिल्याचं कवाडे यांनी सांगितलं आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये पुढील चर्चा होणार असून महापालिका निवडणुकीतच शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रं आल्याचं दिसून येणार असल्याचंही कवाडे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमचा अजेंडा त्यांना सांगितला. आमच्या पक्षाची भूमिकाही सांगितली. त्यावर साधकबाधक चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संयुक्त घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती कवाडे यांनी या भेटीनंतर दिली. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.