..तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल”, शिंदेगटातील ‘या’ मंत्र्याने केला दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले.
या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता शिंदेगटातील मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक अट ठेवली आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं सहजासहजी सोडून जात नाहीत. त्यामुळे काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं आत्मपरिक्षण जसं मी केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही त्याचं आत्मपरिक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरिक्षण केलं तर शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं उद्धवजींच्या हातात आहे. मी त्यांचा आदर ठेवणारा मनुष्य आहे असेदेखील ते यावेळी म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेदेखील कौतुक केले. अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतात मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजीतदादांसारखा असावा, असं वाटतं. जसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे. तसाच विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांचादेखील आम्हाला अभिमान आहे. अशा शब्दात दीपक केसरकर यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे.