नागपूर अधिवेशनात विदर्भाकडेच दुर्लक्ष ; ‘सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना अग्रक्रमाने प्रश्न तालिकेत वरचे स्थान मिळाले पाहिजे :- आ. इंद्रनील नाईक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना सभागृहात स्थान मिळत नसल्याने वैदर्भीय आमदारांच्या मनात खदखद आहे.
पुसद (जि.) यवतमाळ) – महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना सभागृहात स्थान मिळत नसल्याने वैदर्भीय आमदारांच्या मनात खदखद आहे. नागपूर अधिवेशनात विदर्भाकडेच दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
‘मविआ’प्रमाणेच शिंदे-फडणवीस सरकारने विदर्भाच्या प्रश्नांकडे अजूनपर्यंत लक्ष दिलेले नाही. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष असो अथवा वीज तुटवडा, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीचा प्रश्न असो वा अतिवृष्टी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात तरी विदर्भातील प्रश्न सभागृहात विचारण्याची संधी वैदर्भीय आमदारांना न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसून आला.
आमदार इंद्रनील नाईक म्हणाले की, ‘सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना अग्रक्रमाने प्रश्न तालिकेत वरचे स्थान मिळाले पाहिजे. ही भूमिका आपण विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेते अजित पवार यांच्यापुढे मांडली. सभागृहात सर्वप्रथम प्रश्न विचारण्याची पक्षाच्या वतीने संधी मला दिली. परंतु, सभागृहातील गोंधळ, निलंबन, बहिष्कार या गोष्टींमुळे मी अभ्यासपूर्ण तयार केलेल्या विदर्भातील सर्वंकष प्रश्नांवर सभागृहात जागा मिळाली नाही.
अमरावती जिल्ह्यातील ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष, अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यावरुन राज्य सरकारला चांगले धारेवर धरले. बाजार समितीच्या निवडणुकीवरून त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या. ‘आता जुनी यंत्रणा बदललीच आहे, तर सरपंचासोबत थेट जनतेतूनच मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडा’, असा उपरोधिक टोला त्यांनी लावला. उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र, विदर्भाच्या प्रश्नावर जिल्ह्यातील आमदारांची चडफड दिसून आली नाही. आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या पुसद रिंग रोडचा लक्षवेधी प्रश्नही अद्याप रांगेमध्ये आहे.
विदर्भातील प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्याचा आमचा अधिकार आहे. तो हक्क आम्ही घेऊच. येत्या आठवड्यात ही संधी मिळताच विदर्भाचे प्रश्न उपस्थित करू. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जागर करू.
– इंद्रनील नाईक, आमदार, पुसद (जि. यवतमाळ)
प्रश्नांचा ‘अनुशेष’ कधी भरणार..?
विदर्भ त्यातही पश्चिम विदर्भातील आमदारांच्या प्रश्नांना स्थान न मिळण्याच्या ‘अनुशेषा’बद्दल आमदार नाराज आहेत. नवीन युवा आमदारांना आपल्या भागातील प्रश्न मांडण्याची संधी मिळावयास हवी. प्रत्यक्षात अधिवेशनाचे कामकाज वेगळ्या दिशेने चालत असल्याने वैदर्भीय प्रश्नांना बगल मिळत आहे, मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार, असा प्रश्न आमदारांना पडला आहे.