अजितदादांनी मांडला कर्नाटक वादाचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षांनी मध्येच अडवलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. आक्रमक असलेल्या विरोधकांपुढे राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यातील उद्योगाची पळवापळवी यावर विरोधक आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसंच लोकायुक्त कायद्याचं बिलंही अधिवेशनात मांडलं जाणार आहे. त्यातच आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे कर्नाटक सीमावाद सभागृहात बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांना मध्येच अडवलं. अजित पवार काय म्हणाले – आपण ज्या पक्षाचे काम करतो, त्या पक्षाचे चिन्ह लावून कधी सभागृहात येत नाही.
ती पद्धत आपल्याकडे नाही. पंतप्रधान मोदी सुद्धा हा नियम पाळतात. सर्वांनी तसं वागावं. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सीमाभागावर वादाबद्दल दिल्लीत बैठक बोलावली होती.
मुळात सीमाभागाच्या मुद्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. 6 डिसेंबरला चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे जाणार होते पण महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे त्यांनी टाळलं. त्यानंतर दोन्हीकडून नेते जाणार होते. कर्नाटकमध्ये कुणाला अडवणार नाही, असं अमित शहांसमोर ठरलं होतं.
पण आमदारांना कर्नाटकने का रोखलं, हे अजिबात आपण खपवून घेऊ नये, असं अजितदादांनी ठामपणे सांगितलं.
दरम्यान, अजितदादा कर्नाटकच्या मुद्यावर बोलत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थांबवलं. अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा हा समजला आहे, पुढच्या कामकाजाकडे जाऊ या, बसा जरा खाली बसा, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत धिक्कार असो सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.