आता निवडणुका घेण्याची हिंमत दाखवा ; आदित्य ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गुजरात, हिमाचल या राज्यांबरोबरच दिल्ली महापालिकेचे निकाल लागलेत. या मोठय़ा विजयानंतर आता त्यांना राज्यात निवडणूक घ्यायला भीतीचं काहीच कारण नाही. आतातरी राज्यात लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या, असं आव्हान युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिलं आहे.
राज्यात महापालिकांबरोबरच राज्य विधानसभेची निवडणूक घ्यायला हवी, कारण राज्यात सध्या घटनाबाह्य सरकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
रोहा इथं सुरू झालेल्या राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज महाराष्ट्राचे खच्चीकरण सुरू आहे. एकीकडे राज्यातील उद्योग पळवले जाताहेत. राज्यातील गावे, जिल्हे पळवले जाताहेत. महत्त्वाचे म्हणजे महापुरुषांचा अवमान केला जातोय. त्याविरोधात मोठा मोर्चा काढतोय. केवळ हा महाविकास आघाडीचा मोर्चा नाही. राज्यातील सर्व महाराष्ट्रप्रेमींचा हा मोर्चा आहे. त्यात भाजपमध्ये जे महाराष्ट्रप्रेमी आहेत त्यांनीही सहभागी व्हावं, असं आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
हे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील पाच महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. आम्ही आणलेला रोह्यातील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही केला. बेळगाव प्रश्नावर आज कोणी बोलत नाही, तिथे मंत्री जाणार होते ते तिकडे गेले नाहीत. हे सरकार घाबरट सरकार आहे. राज्यात महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, मूलभूत प्रश्न सोडून राजकारण दूषित करण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
विधान परिषदेच्या १२ जागांसंदर्भात
राज्यपालांच्या निर्णयाला आम्ही आव्हान दिलेले आहे. मुळातच कोषारी हे राज्यपाल आम्ही मानायला तयार नाहीत, हे राज्यपाल छ्त्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांचा अवमान करतात. अनेक राज्यपाल इथं होऊन गेले. पण असे राजकीय राज्यपाल कधी आम्ही पाहिले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
राज्य अजिंक्यपद, निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात
४८ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेला गुरुवारी संध्याकाळी रोह्यात प्रारंभ झाला. राज्यभरातील मुलं व मुलींच्या ४८ संघातील ८०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धाचे आयोजन करण्यात आलं आहे. स्वर्गीय नथुराम पाटील क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धाचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, उद्योजक पुनीत बालन, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यावेळी उपस्थित होते. सध्या महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशावेळी खेळात सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देण्याची जबाबदारी तुम्हा खेळाडूंची आहे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.