फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी.….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पैठणच्या संत पिठाच्या कार्यक्रमात बोलतांना, शाळा चालू करण्यासाठी फुले- आंबेडकरांनी भीक मागितली असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
त्यांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता, तर अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे अखेर चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या विधानामुळे कोणाचं मन दुखावले गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे पाटील म्हणाले. तर आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा देखील पाटील म्हणाले.
काय म्हणाले पाटील…
कालपासून पाटील यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भीक म्हणजे काय तर आपण महापुरुषांच्या जयंतीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्साहाच्या वेळी वर्गणी जमा करतो. त्यामुळे या भीक शब्दाने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी काहीही हरकत नाही, असं पाटील म्हणाले.
राज्यभरात आंदोलन…
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असतांना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहे. तर औरंगाबादमध्ये देखील काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर आज सकाळी देखील पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील…
पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करतांना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगल्या कामासाठी पैसे देत आहेत. मात्र सरकारवर अवलंबून का राहत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. यावेळी त्यांना शाळा सुरु करतांना सरकराने अनुदान दिले नव्हते. तर आम्ही शाळा चालवत आहे, पैसे द्या म्हणून त्यावेळी त्यांनी लोकांकडे भिक मागितली. त्यामुळे कंपन्यांनी सामाजिक कामासाठी सहकार्य करावे. आपण मंदिर उभं करतो, तेव्हा सरकारकडे थोडी पैसे मागतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.