मराठा क्रांती मोर्चा कडून पंतप्रधानांच्या आधीच समृद्धी महामार्गाचे उद्घाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त व अपमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केंद्र किंवा राज्य सरकारच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.
याचाच निषेध म्हणून आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंतप्रधानांच्या आधीच शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन करून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले.
नागपूर ते मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्या उद्घाटन होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या मार्गावरील औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी बायपास परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात निषेध व्यक्त केला.
शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्ष करीत आहे. मात्र केंद्र व राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांच नाव घेवून मत मागितली त्यांना आता महाराजांचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन बॅनरवर शिवाजी महाराजांचा फोटो देखील नाही. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आम्ही पंतप्रधानांच्या आधीच या महामार्गाचे उद्घाटन केल्याचे यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.