‘मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला’, असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काही दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. देशातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकण्यास सुरुवात केली असतानाच यामध्ये काही महत्त्वाचे मुद्देही प्रकर्षानं उचलून धरण्यात आले.
मग ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य असो किंवा कर्नाटक- महाराष्ट्र वाद असो. हिवाळी अधिवेशनात नेतेमंडळींनी आपल्या शब्दांवाटे अशा गोष्टी मांडल्या ज्याच्याशी अनेकांचंच एकमतही झालं. त्यातच राज्यमंत्री रामदास आठवसे मात्र नेहमीप्रमाणे त्यांचं वेगळेपण सिद्ध करून गेले.
संसदेत उप-सभापती जगदीप धनखड यांना शुभेच्छा देताना आपल्या स्वागतपर काव्यमय भाषणात आठवले यांनी सर्वांचीच मनं जिंकली. यावेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्यांध्ये एकच हशा पिकला. आठवले उभे राहिले म्हणजे ते किमान चार ओळी तरी कवितेतूनच बोलणार याची सर्वांना अपेक्षा होती. इथंतर त्यांनी कवितेपासूनच आपल्या संबोधनाची सुरुवात केली आणि ती पाच मिनिटं सभागृहात अनेकजण खळखळून हसताना दिसले. काहींच्या डोळ्यांत तर, या क्षणी हसून हसून पाणीही आल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले रामदास आठवले?
‘मै तो अन्याय के खिलाफ लढा हूं, इसलिये आपको बधाई देनेकेलिये यहां खडा हूं.
आपका अनुभव बहुतही बडा है, इसलिये आपने संघर्ष का पहाड चढा है.
मेरे पार्टी मै हूं अकेला, लेकिन मेरे हाथ मे है संविधान का पेला, मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला
जिन्होने उपराष्ट्रपतीका सर किया है गड उनका नाम हे धनख़ड, हमे मिलकर उखाड देनी है विषमता की जड, इसमे जरुर सफल होंगे आदरणीय धनखड
हाऊस मे जो सदस्य करेंगे फ्रॅक्शन, उनके उपर होनी चाहिये कडी अॅक्शन… ‘, असं म्हणत त्यांनी धनखड यांचा संघर्ष सभागृहापुढे मांडला. त्यांचा अनुभव, प्रवास आणि संघर्ष आठवलेंनी स्वत:च्याच शैलीत मांडला. पश्चिम बंगालमधील राज्यपालपदी असताना त्यांनी केलेल्या कामाचं कौतुकही आठवलेंनी केलं.
भाजपला साथ का?
आपण भाजपसोबत हातमिळवणी का केली, यासंदर्भात बोलतानाही रामदास आठवले यांनी आपण शिर्डीत पराभूत झालो, मंत्रीपद देण्यात आलं नाही, परिणामी काँग्रेस सोडावं लागलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आल्याचं सांगितलं. माझी पार्टी सत्तेत येऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी याच कारणास्तव आपण भाजपसोबत आल्याचंही सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांची पाठराखण
महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा चालू करण्यासाठी भीक मागितली असं आक्षेपार्ह वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं त्यावरही आठवले व्यक्त झाले. संसदेत आपल्या कवितेच्या शैलीनं सभासदांना काही क्षणांचा आनंद देणाऱ्या आठवले यांनी इथं चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली. महापुरूषांनी वर्गणी घेऊन शाळा सुरू केल्या, त्यामुळे सरकारी अनुदानावर अवलंबून राहु नका असंच चंद्रकांत पाटलांना म्हणायचं होतं असं रामदास आठवलेंनी म्हटलं.