माफीने भागणार नाही, नाकच रगडायला पाहिजे ; शिवसेनेची भाजपवर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपच्या नेत्यांकडून शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधानं केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेला देशप्रेम शिकवण्याची गरज नाही. राज्यपालांनी एकट्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सुधांशू त्रिवेदी, आमदार लाड आणि केंद्रीयमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. भाजपच्या नेत्यांनी विडा उचलला आहे. अफजलखानने देखील विडाच उचलला होता. तसाच विडा भाजपच्या नेत्यांनी उचलला आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान करू, हाच विडा यांनी उचलला आहे. या लोकांची हीच प्रवृत्ती असल्याचं दानवे म्हणाले.
दानवे पुढं म्हणाले की, महाराष्ट्रातील गेलेले उद्योग, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लहान मुलांना ठावूक आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झालेला आहे. तरी हे म्हणतात, शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. यावर केवळ माफी मागून भागणार नाही, तर नाक रगडलं पाहिजे, असंही दानवे यांनी म्हटलं.