चक्रीवादळ घोंघावतंय…! महाराष्ट्रावर काय आणि कुठे होणार परिणाम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मेंडोस चक्रीवादळ थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे.
त्यामुळे पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वारेही वाहण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नसला तरी दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर येणाऱ्या शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती
बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता आहे.