महाराष्ट्र-कर्नाटकनंतर आता नवा सीमावाद ; बुलडाण्यातील चार गावांनी केली मध्यप्रदेशात जाण्याची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलडाणा :- राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर आता मध्यप्रदेश सीमावाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली, नांदेड येथील सीमाभागातील गावांनंतर आता महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाणा जिल्ह्यातील चार गावांतील नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे.
गावात मुलभूत सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी संतप्त होऊन हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील भिंगारा 40 टपरी गोमाल एक आणि गोमाल दोन अशा चार गावातील नागरिकांनी मध्यप्रदेशात जाण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि जळगाव जामोद तालुका प्रशासन त्यांच्या गावांना मुलभूत सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्यानं सीमाभागातील या गावांना मध्य प्रदेशात सामील करून देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. गावकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर चारही गावातील नागरिकांनी राज्य सरकार आणि बुलढाणा जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि परिसरातील इतर तीन गावांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. या भागांत प्रवासासाठी जळगाव जामोद ते बुऱ्हानपूर मार्गावरील भिंगारा फाट्यावरून जावं लागतं. पण हा मार्ग जंगली भागांतून जात असल्याने कोणतेही चारचाकी वाहनेही जात नाही. त्यातच रस्तेही अतिशय खराब जर कोणी आजारी पडलं तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रसुतीसाठी महिलांना खांद्यावर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत आणावं लागतं. या भागांतील तालुका प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी वर्ष-दोन वर्ष गावांत फिरकतही नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला आहे.