भाजप हा नीतिमत्ता नसलेला पक्ष ; नाना पटोलेंचा घणाघात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (माहूर) :- काँग्रेस पक्ष हा शिवरायांना मानणारा, सोबतच महापुरुषांचे विचार घेऊन चालणारा पक्ष आहे तर भाजप हा नीतिमत्ता नसलेला पक्ष असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (ता.५) केला. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी माहूर गडावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले, आरती करून नवसपूर्ती केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे सोबत होते. महाविकास आघाडीतील घटक पक्षातील दोन्ही नेते मंदिरात आमनेसामने आल्यानंतर संस्थान कार्यालयात दोघांत गप्पा रंगल्या होत्या. रेणुका देवी संस्थानाच्या वतीने दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला. देवीच्या दर्शनानंतर मुंडे यवतमाळकडे रवाना झाले.
माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त विधाने करण्याची मालिका भाजप नेत्यांनी आळीपाळीने चालविली आहे. निवडणुकीवेळी महापुरुषांचे नाव घेऊन मते मागायची आणि नंतर त्यांच्यासंदर्भात वादग्रस्त आणि संतापजनक विधाने करायचे, ही भाजपची प्रवृत्ती आहे. जनतेला आता हे चांगल्या प्रकारे समजले आहे. संविधानिक पदावर असलेले राज्यपाल असो किंवा केंद्रात मंत्री असलेले दानवे, हे पेशवाईचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, तालुकाध्यक्ष संजय राठोड, नगरसेवक प्रा. राजेंद्र केशवे, डॉ. निरंजन केशवे, दिनकर दहिफळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.