“चलो आझाद मैदान” 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा महामोर्चा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य आदर्शांचा भाजपा नेत्यांकडून सातत्याने होणारा अपमान, महाराष्ट्राची होणारी अवहेलना, कर्नाटककडून महाराष्ट्रावर होत असलेले हल्ले, उद्योगांची पळवापळवी, वाढती बेरोजगारी आणि महागाई अशा विविध मुद्यांवरून महाविकास आघाडीने ‘चलो आझाद मैदान’ अशी हाक आज दिली. येत्या 17 डिसेंबर रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा काढला जाणार आहे. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची शक्ती काय आहे हे महाराष्ट्रद्वेष्टय़ांना दाखवून देण्यासाठी प्रत्येक शिवरायप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमीने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि इतर घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक आज सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. त्या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, समाजवादी पार्टीचे अबू असीम आझमी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, भाई जगताप यांच्यासह सीपीआय, सीपीएम पक्षाचे नेते उपस्थित होते. त्या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी या महामोर्चाची घोषणा केली.
उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, महाविकास आघाडीचे चांगले चाललेले सरकार गद्दारी आणि कटकारस्थाने करून पाडल्यानंतर अस्तित्वात आलेल्या सरकारच्या काळात महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना आणि अवमान होत आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच फुटीरतेची बीजे टाकली जात आहेत. काही गावे म्हणताहेत आम्हाला कर्नाटकात जायचेय. काही म्हणत आहेत आम्हाला तेलंगाणात जायचेय काहींना गुजरातमध्ये जायचे आहे. हे असे कधीच घडले नव्हते. शिवछत्रपतींचा एकसंध महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जातोय. असे सांगतानाच, हे कोण करतोय हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. कर्नाटक सरकार फार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. ते अक्कलकोटवर हक्क सांगत आहेत. सोलापूरवर सांगताहेत. मग सोलापूर म्हटल्यावर आमचा पंढरपूरचा विठोबा पण मागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सांगलीच्या जत तालुक्यातील ग्रामस्थ म्हणताहेत की त्यांना कर्नाटकात जायचेय. त्यामुळे आपल्या राज्याला सरकार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
कर्नाटकच्या निवडणुकीसाठी गावे तोडली जात आहेत का
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले की, राज्यपालपदी कुठूनही, कोणालाही पाठवले जात आहे. ते राज्यपाल आहेत म्हणून मानसन्मान राखावा लागतोय. पण हेच राज्यपाल छत्रपतींचा अपमान करत आहेत. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्रात, हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. भाजपालाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपाला महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे महत्व छिन्नविछिन्न करून टाकायचे आहेत. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्रात येऊ शकणारे आणि येत होते ते उद्योग ते इतर राज्यांत पळवत आहेत. गुजरातच्या निवडणुकीआधी ती जिंकण्यासाठी भाजपने येथील उद्योग पळवले. आता येत्या काही महिन्यात येणाऱ्या कर्नाटकातील निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गावे खरोखरच तोडली जाणार आहेत का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
जी-20 पेक्षा मला शेतकरी जिव्हाळ्याचे
जी-20 परिषदेबद्दल प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी, तो जागतिक विषय असून त्यापेक्षा शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषय मला जास्त जिव्हाळ्याचे आहेत असे सांगितले.
आम्ही कधीही बेळगावात जाऊ शकतो
सद्य परिस्थितीत बेळगावमधील सीमावासियांना महाराष्ट्राच्या पाठिंब्याची गरज असून विरोधी पक्षापैकी कुणी तिथे जाणार आहे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारला गेला. त्यावर आम्ही कधीही जाऊ शकतो आणि यापूर्वीही गेलेले आहेत असे सांगत उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ आणि संजय राऊत यांचे दाखलेही दिले. त्यापुढे बोलताना त्यांनी आता जबाबदारी कोणाची, ती स्वीकारणार आहेत की नाही असा प्रतिसवाल राज्य सरकारला केला. कर्नाटक म्हणजे काही हिंदुस्थान-पाकिस्तानची सीमारेषा नाही. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री जसे आक्रमकपणे बोलत आहेत तसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आवंढा गिळून काहीतरी बोलावे, की तेसुद्धा गुवाहाटीला जाऊन बोलणार आहेत, अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बैठकीत काय चर्चा झाली त्याबद्दल माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली. त्यानंतर भाजपा नेत्यांनी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर हल्ला सुरू केला आहे. गुजरातसारखी राज्ये महाराष्ट्रातील उद्योग पळवत आहेत. या मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा होऊन विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका घ्यायची याचा अॅक्शन प्लॅन ठरला अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
8 डिसेंबरला पुन्हा बैठक
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, या मोर्चात महाविकास आघाडीतील तीन पक्ष सहभागी होणार आहेतच पण कपिल पाटील, सपाचे अबु आझमी, शेकापचे जयंत पाटील व घटक पक्षांशीही चर्चा केली असून तेही सहभागी होणार आहेत. या मोर्चाची पुढील आखणी करण्यासाठी 8 डिसेंबरला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व राजकीय पक्षांची बैठक होणार आहे.
स्थगिती दिल्याने असंतोष
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात नांदेड जिह्यातील देगलूरमधील जनतेने आम्हाला तेलंगणामध्ये जायचे आहे असे कधीही सांगितले नव्हते, पण आज ती गावे आम्हाला तेलंगणामध्ये जायचे आहे असे सांगत आहेत. सांगली, अक्कलकोटमधील लोकही आम्हाला शेजारच्या राज्यात जायचे आहे असे बोलायला लागली आहेत. नाशिक व नंदुरबारच्या आदिवासी भागातील लोकही गुजरातमध्ये जायचे आहे असे बोलायला लागले आहेत. वास्तविक वेगवेगळे राज्यकर्ते राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करीत होते पण कोणाच्याही काळात अशा प्रकारे सीमेवर असलेल्या तालुक्यातील गावांनी अशी इच्छा प्रदर्शित केली नव्हती कारण त्या तालुक्यांकडे लक्ष दिले जात होते. त्यासाठी डीपीसीमध्ये तरतूद केली जात होती. पण आता तीही थांबवली. सांगली जिह्यात जयंत पाटील यांनी तरतूद केली होती तीही थांबवली. नाशिक जिह्यातील नंदुरबारमध्ये छगन भुजबळ यांनी तरतूद केली होती. त्यालाही स्थगिती दिली. सरकारने ही स्थगिती दिल्यामुळे तिथे असंतोष आहे असे कधी कोणतेही सरकार करीत नव्हते.
या सरकारचे नको ते उद्योग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना राज्यात चांगल्या प्रकारे काम झाले आहे असे उद्योग क्षेत्रातील आढावा वेगवेगळ्या संस्थानी नमूद केले आहे. दुसरे उद्योग राज्यात आणू असे या सरकारमधील मंत्री बोलतात पण जे उद्योग आले होते ते घालवले आणि दुसरे उद्योग कसले आणता असा सवाल अजित पवार यांनी केला. या सरकारचे बाकीचे नको ते उद्योग चालले आहेत, असा टोला अजित पवार यांनी मारला.
ज्यांचे रक्त उसळलेय, त्यांना मोर्चाचे आमंत्रण देतोय
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक आज झाली. मित्रपक्षांबरोबरही आम्ही बोललो. एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे हे सर्वांनी मान्य केले आहे. विधानसभेचे अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होत आहे. त्याआधी 17 डिसेंबरला शनिवारी मुंबईत अतीभव्य, अतीविराट, न भूतो न भविष्यती अशा स्वरुपाचा मोर्चा काढायचे आम्ही ठरवले आहे. हा मोर्चा केवळ राज्यपाल हटाव या मुद्दय़ासाठी नाही तर ज्यांनी-ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय त्या सर्वांविरुध्द आहे, असे ठणकावून सांगतानाच, हा मोर्चा ही तर केवळ सुरूवात आहे असा गर्भित इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
हा महामोर्चा केवळ महाविकास आघाडीचा नव्हे तर ज्यांना शिवरायांचा, महाराष्ट्राचा अवमान सहन होत नाही, त्या अवमानामुळे ज्यांचे रक्त उसळले आहे त्या सर्वांचा आहे, त्यांना मी आमंत्रण देतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपमधील छत्रपतीप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी यांनाही आपण आमंत्रण देतोय असे ते म्हणाले.
नेभळट सरकारविरुद्ध मोर्चासाठी राज्यपालांना निवेदन का द्यायचे
रत्यावर मोर्चा काढणार आहात तर राज्यपालांना निवेदन देणार का असा सवाल यावेळी प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना केला. त्यावर ते म्हणाले की, आमचा राज्यपालांवर आक्षेप आहेच. त्यांना निवेदन कशासाठी देऊ. निवडणुक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दल सुप्रीम कोर्टात विषय चालू आहे. तसेच राज्यपालांच्या नेमणुकीबद्दलही निकष ठरवले गेलेच पाहिजेत. कुणीही आपला म्हणून कुठेही पाठवायचा आणि आम्ही त्याला राज्यपाल म्हणून स्वीकारायचे. आणि नंतर तो आमच्याच राज्यात येऊन आमच्या आदर्शांचा अपमान करणार. आमच्या राज्यात हिंदूंमध्ये फूट पाडणार. दुजाभाव निर्माण करणार. काय म्हणून त्यांना निवेदन द्यायचे. आमचा मोर्चा नेभळट सरकारविरुध्द आहे आणि त्यातला एक विषय राज्यपालांचाही आहे.
महाराष्ट्र कधीही झुकला नाही
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई एवढय़ा वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करीत आहेत. त्या राज्यात भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आहे. भाजपमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यातल्या मंत्र्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. हे कसे सहन करता? वास्तविक देशातल्या कोणत्याही राज्यात कोणालाही जाण्याचा अधिकार आहे पण तरीही महाराष्ट्रातील मंत्र्यांनी माघार घेतली राज्यातील मंत्री कर्नाटकला का जात नाहीत? मंत्र्यांमध्ये ताकद-धमक नाही का ? महाराष्ट्राची संस्कृती-परंपरा काय ? महाराष्ट्र कोणाच्या समोर झुकलेला नाही. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे. मात्र त्या सर्व परंपरेला बाजूला सारण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. त्यामुळे लंगडे समर्थन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे सर्व संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. म्हणूनच आमच्या सर्व पक्षांच्यावतीने उध्दव ठाकरे यांनी सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम झाले आहे. महाराष्ट्राच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे. म्हणूनच हा महामोर्चा आहे असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
इतका नेभळट महाराष्ट्र आजवर कुणी पाहिला नव्हता
मिंधे सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहेत हे कळणार कधी, असा सवाल यावेळी केला. सीमाबांधवांशी चर्चा करण्यासाठी आपले मंत्री आज कर्नाटकात जाणार होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर त्यांचा दौरा रद्द झाला. हा एवढा नेभळट महाराष्ट्र आजपर्यंत कुणीही पाहिला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हे नेभळट सरकार म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे सांगण्याची वेळ आता आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
कर्नाटकमध्ये जाण्यासाठी हिंमत पाहिजे
अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे दोन मंत्री कर्नाटकमध्ये जाणार असे क@बिनेटमध्ये सांगितले. आणि आता पुन्हा माघार घेता ? तेथील मुख्यमंत्र्याचे वक्तव्य आल्यावर तुम्ही ‘अरे ला का रे’ उत्तर दिले का, असा सणसणीत सवाल केला. पूर्वी छगन भुजबळ हे वेषभूषा बदलून कर्नाटकमध्ये गेले होते. जायचे म्हटले तर कसेही जाता येते. त्यासाठी हिंमत पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, असे खडे बोल अजित पवार यांनी यावेळी सुनावले.
मोर्चातून जनतेचा असंतोष व्यक्त होणार
काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. ही अवहेलना महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस सहन करणार नाही. सर्वसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष या मार्चातून व्यक्त होणार आहे. महाराष्ट्राला हानीकारक असलेले वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री करतात आणि आमचे मुख्यमंत्री त्याला उत्तरही देत नाहीत. हे सरकार महाराष्ट्राची अस्मिता जपणार नसेल तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे हा इशारा देणारा मोर्चा आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सकारात्मक
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेबाबतही उद्धव ठाकरे यांना यावेळी पत्रकारांनी विचारले. त्यावर आंबेडकर यांच्याशी चर्चा प़ॉझिटिव्ह झाली. पुढे जाऊन काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही बारकाव्यांवर विचार सुरू आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण होईल. महाविकास आघाडी स्थापन करतानाही आमच्या अनेक बैठका झाल्या होत्या. पण प्रकाश आंबेडकर यांची आघाडीत येण्याची मानसिकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महामोर्चाकशासाठी?
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी केलेला अवमान.
महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची गुजरातमध्ये पळवापळवी सुरू आहे. त्याविरोधात असंतोष आहे.
फुटीरतेची बीजे पेरून महाराष्ट्रातील गावे तोडण्याचे भाजपचे षड्यंत्र. एकसंध महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री धमकी देतात पण महाराष्ट्राचे मिंधे मुख्यमंत्री साधे प्रत्युत्तरही देत नाहीत.
महागाईचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या महागाईतून सुटका करण्याचा मार्ग ना पेंद्र सरकारकडे, ना राज्य सरकारकडे.
बेरोजगारीचा प्रश्नही जटील झाला आहे. मात्र राज्य सरकार त्याकडे बघतही नाही.
भाजपने राज्यपालांना 17 डिसेंबरआधी हटवले तरीही महामोर्चा निघणारच!