मुख्यमंत्री नवस फेडायला गुवाहाटीला जातात, मग बेळगाव महाराष्ट्रात यावं म्हणून नवस का करत नाहीत….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गप्प का ?
राज्यपालांची नियुक्ती ही कोणत्या आधारावर केली जावी याचेही निकष ठरवले गेले पाहिजेत!
कर्नाटकने आपल्या तलावांमध्ये पाणी सोडले आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खात आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमक होत आहेत, मग आमच्या राज्याचे मुख्यमंत्री शांत का ? नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले, मग बेळगाव महाराष्ट्रात यावा यासाठी नवस का करीत नाहीत, असा खणखणीत सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांना ‘ठाकरी टोला’ हाणला.
संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सोलापूरमध्ये कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेल्या मौनावर कडाडून टीका केली. वास्तविक प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असते, पण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे नाते काय हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही. राज्याचे दोन मंत्री कर्नाटकमध्ये जाणार होते, पण कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना येण्यास मज्जाव केला आहे; मात्र यावरही मुख्यमंत्री काही बोलले नाहीत याकडे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असते, पण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे नाते काय हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेले नाही.
नियुक्तीचे निकष काय हे ठरवा!
राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी-दूत असतात. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत जसे प्रश्नचिन्ह निर्माण केले त्याचप्रकारे राज्यपालांची नियुक्ती ही कोणत्या आधारावर केली जावी याचेही निकष ठरवले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र काय हे दाखवण्याची वेळ आली
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात भूमिका घेणारे उदयनराजे यांना उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले. एका मंत्र्याने महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना शिवछत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेशी केली आणि अजूनही ते मंत्रीपदावर राहात असतील तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते लवकरच दाखवणार, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
सत्ताधाऱ्यांच्या गटांगळ्या
कर्नाटकने सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याला पाणी दिले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न केला असता, कर्नाटकने आपल्या तलावांमध्ये पाणी सोडले आहे आणि आपले सत्ताधारी सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खात आहेत. या नेभळटपणाविरुद्ध आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.