शिंदे सरकार दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्य ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काहीतरी नवीन घडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता.
अक्कलकोट आणि सोलापूर हे देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा एकदा पेटला. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील 40 गावांना पाणी दिले आणि या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईत कर्नाटक भवन बांधत आहेत. बेळगावमध्ये येऊ नका, असे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांना पाठवता. मात्र, याविरोधात आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा उच्चारत नाहीत. अद्याप मुख्यमंत्री शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.’
‘महाराष्ट्राला मिंधे सरकारची फळ भोगावी लागत आहेत. मिंधे सरकार हे दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांच्याकडून अभिमान, स्वाभिमानाची अपेक्षा नाही. एकीकडे कर्नाटक महाराष्ट्रातील गावातील पाणी सोडून ते गाव घशात घालण्याचा डाव रचतोय. तर, दुसरीकडे, आपले मिंधे सरकार मात्र, सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खात आहे,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
बिनडोक माणूस राज्यपाल पदावर नको-
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यपाल हे केवळ राज्यपाल नाही तर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. राज्यापालांच्या नियुक्तीचे निकष ठरवले गेले पाहीजे. केवळ माझ्या मर्जीतला आहे म्हणून कोणताही बिनडोक माणूस या पदावर बसवणे, असे चालणार नाही.’
‘मी गेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. जे शिवप्रेमी आहेत. या विरुद्ध आवाज उठवायला पाहीजे. तो कार्यक्रम आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. उदयनराजेंना मी धन्यवाद देईल कारण मी म्हटले आज जी काही भूमिका मांडली त्याबाबत मी त्यांना धन्यवाद देईल. भाजपमधील शिवरायप्रेमीही आता राज्यपालांविरोधात बोलत आहेत, ही चांगली गोष्ट आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही राज्य सरकारला अवधी दिला होता. कारण घाई-घाईने काही व्हायला नको. मात्र राज्यपालांना पाठींबाच मिळत असेल. तर आम्हाला लवकरच आमच्या मार्गाने निषेध करावा लागेल, महाराष्ट्र बंद किंवा असाच काही कार्यक्रम करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.