भाजप शिंदे गटात लवकरच वाजणार ; शिवसेनेचा दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे आणि 40 समर्थक आमदार शिवसेनेतून बंड करून बाहेर पडून नव्या सरकार स्थापनेनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. तसेच याच दरम्यानच्या काळात फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते.
तर बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत असल्याची बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा जास्त वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत असल्याची खरमरीत टीका राऊत यांनी केली आहेत. तर भाजपमधील एका मोठ्या गटाचे भांडण हे शिवसेना ठाकरे गटाशी राहणार नसून ते शिंदे आणि त्यांच्या गटासोबत निर्माण होणार असल्याचे सूचक वक्तव्यही संजय राऊत यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी कामाख्या देवीची यात्रा करून मुख्यमंत्री व त्यांच्या गटाचे आमदार परतले. जनावरांचे बळी देऊन नवस फेडण्यासाठी ते गेले होते हे आता जगजाहीर आहे. तो नवस काही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता. फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते. बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत आहे अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री हतबल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हतबल असल्याचा आरोप राऊत यांनी केला. मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे आणि ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत असल्याची टीका राऊत यांनी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत. शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजपचे मंत्री मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना मानायला तयार नाहीत. यापुढे भाजपच्या मोठय़ा गटाचे भांडण शिवसेनेशी राहणार नसून ते शिंदे व त्यांच्या गटाशी राहील व त्याच अंतर्विरोधातून सध्याची व्यवस्था कोलमडून पडेल असा दावाही त्यांनी केला.