‘आम्हाला तिकडे जाऊ द्या’ सांगलीकरांनी कर्नाटकचे झेंडे घेऊन काढली पदयात्रा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- कर्नाटक सरकारने सांगलीतील 40 गावांवर दावा केल्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. पण आता सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.
आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ द्या असं म्हणत कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन पदयात्रा काढली. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली.
कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून दोन किलोमीटरवर कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्याची सीमा आहे. कर्नाटक सरकार तीन वर्षांपासून मोफत तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी ओढापात्रात सोडत आहे.
कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा आणि अनुदान देते.
महाराष्ट्र सरकार म्हैसाळचे पाणी देणार असल्याचे सांगत 50 वर्षांपासून राजकारण करीत आहे. आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, वीज बिल भरले नाहीतर कापली जाते, पण कर्नाटक सरकारकडून अशी कोणतीही कारवाई होत नाही, अशी येथील ग्रामस्थांची भावना आहे. सिद्धनाथ महाराष्ट्रात असून येथे उच्च शिक्षणाची सोय नाही. भाषेची अडचण आहे.
येथे कर्नाटक महामंडळाच्या चार बसेस तर महाराष्ट्राच्या दोन बस येतात. गाव पाण्यापासून वंचित आहे. मागणी, पाठपुरावा करूनही एसटी, म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्नाटकचा ध्वज घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरून बसवेश्वर चौकापर्यंत पदयात्रा काढली.
कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जतवरून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ताजा असतानाच आता चंद्रपूर जिह्ल्यातील १४ गावाचा सीमा प्रश्न चर्चेत आलाय. ९०च्या दशकातील आंध्र संरकारनं जिवती तालुक्यातील १४ गावांवर आपला हक्क सांगितल्यानं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालायात गेलं होतं. १९९७ साली सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निर्वाळा महाराष्ट्राच्या बाजूनं दिला होता. त्यानंतरही आज पर्यंत या गावांचा महाराष्ट्रात पूर्णत: समावेश झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकारनं तिढा सोडवण्यासाठी गांभिर्यानं प्रयत्न करण्याची मागणी स्थानिक करत आहे.