शिवाजी महाराजांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर बरे झाले असते…! उदयनराजेंचे उद्विग्न उद्गार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शिवरायांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या संतापाचा आज स्पह्ट झाला.
शिवाजी महाराजांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर बरे झाले असते, असे उद्विग्न उद्गार उदयनराजे यांनी काढले. यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या आणि भर पत्रकार परिषदेत त्यांच्या डोळय़ांतून घळाघळा अश्रू वाहिले.
राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमी जनतेतून राज्यपाल हटावची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पुणे येथे त्यांनी आज निर्धार शिवसन्मानाचा मेळावा घेतला. विविध शिवप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्याबाबत सारवासारव करणाऱया भाजपला खडेबोल सुनावले.
…तर देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही
महाराजांनी सर्व समाजाचा विचार केला आणि समाजातील सर्व घटकांना एकत्रित केले. आज मात्र व्यक्तीकेंद्रित आणि जातीपातीचे राजकारण सुरू असून हे थांबले नाही तर देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप नेतृत्वाला सुनावले खडेबोल
लेखणीतून, चित्रपटातून किंवा विधानातून शिवरायांचा अपमान होत असेल आणि त्याचा तुम्ही निषेध करणार नसाल, अशा व्यक्तीवर कारवाई करणार नसाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार उरत नाही, असे उदयनराजे यांनी ठणकावले. पक्षश्रेष्ठाRकडून माझ्या अपेक्षा आहेत. शिवरायांच्या विचारांचा आधार पकडून तुम्ही तुमचे प्रोजेक्शन करत आहात, मग शिवरायांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठीच करणार आहात का? पाच वर्षांनी निवडणुका आल्या की तेवढय़ापुरते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार आहात का? शिवरायांची जेव्हा विटंबना, अवमान, अवहेलना होते तेव्हा तुम्हा कुणालाच त्याचे दुःख वाटत नाही का? त्याचा राग येत नाही का?, अशा प्रश्नांची सरबत्ती उदयनराजे यांनी केली.
जनहो, लोकशाहीतले तुम्ही राजे आहात, पण ज्या राजांमुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकत आहोत, त्यांची अवहेलना होत असताना तुम्ही जागे कधी होणार? की हे असंच सहन करत बसणार आहात?, असा सवाल उदयनराजे यांनी केला. शिवरायांबद्दल कुणी काहीही बोलत राहिलं आणि त्यावर काही कारवाई झाली नाही तर असं बोलणाऱयांचे फावेल. भविष्यात अशी अवहेलना करण्याची फॅशनच बनेल हे अजिबात चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अलीकडच्या काळात शिवाजी महाराजांविषयी विकृत वक्तव्ये केली जात आहेत. चित्रपट आणि विविध माध्यमांतून गलिच्छप्रकारे, चुकीचं चित्र उभं केलं जात आहे. हे विकृतीकरण थांबले नाही तर उद्या लहान मुलांच्या समोर हाच तोडलेला, मोडलेला इतिहास येईल. त्यांना सत्य परिस्थिती समजणार नाही. हाच खरा इतिहास आहे, असे त्यांना वाटेल, अशी भीती उदयनराजे यांनी वर्तविली.
सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा समारंभात शिवाजी महाराजांना अभिवादन करतात. मात्र, दुसरीकडे महाराजांची अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही? तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल, तर मग महाराजांचे नाव का घेता? असा सवालदेखील उदयनराजेंनी केला.
महापुरुषांचा अवमान करणाऱयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा
‘देशविरोधी कृत्य केल्यास ज्याप्रकारे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, त्याचप्रमाणे महापुरुषांची बदनामी, त्यांच्या विरोधात नको ती विधाने करणाऱयांविरोधातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा,’ अशी मागणी यावेळी उदयनराजे यांनी केली.
कोश्यारी, त्रिवेदींवर कारवाई करा
हा कोणत्या पक्षाच्या विरोधात अजेंडा नसून विकृत प्रवृत्तीविरुद्ध लढा आहे. यास राजकीय स्वरूप देऊ नये, असे नमूद करताना राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे उदयनराजे यांनी सांगितले.
रायगडावर 3 डिसेंबरला आक्रोश
3 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन आमचा आक्रोश, आमच्या वेदना आम्ही व्यक्त करणार आहोत, असे यावेळी उदयनराजे यांनी सांगितले. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माझे म्हणणे मांडणार आहे. ज्यांनी शिवरायांचा अवमान केला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यावरून मी मागे हटणार नाही, असे उदयनराजे यांनी ठणकावून सांगितले.