‘..नाहीतर तोडफोड करून बाहेर पडणार’, रवी राणांसोबतच्या वादावरुन बच्चू कडूंचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे आणि फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांनी आज तातडीने मुंबईला बोलावून घेतलं आहे.
त्यामुळे आज या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू या वादावर बोलताना म्हणाले, की ‘मी मुंबईला संध्याकाळी आठ वाजता पोहोचणार आहे. दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही.
मात्र कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या आहेत. एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा, अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राणा यांच्या विधानाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, की राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे.
मला असं वाटतं की आता त्यांनी जर व्यवस्थित अभिप्राय दिला तर ठीक आहे. त्याने जे काही आरोप केले त्यासंदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल असं काही केलं तर एक तारखेचा विचार करू. या काळात जी बदनामी केली आहे ती मागे घ्यावी, विषय संपला, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
रवी राणा आणि बच्चू कडूंचा वाद काय?
– प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती आरोप केले आहेत. गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केला होता. यानंतर आमदार रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार केली.