ठाकरेंवर निशाणा साधताना अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी, रामदास कदमांचा घणाघात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर गेले होते. ठाकरेंच्या या दौऱ्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
आता रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरे 20 मिनिटांचा औरंगाबाद दौरा करून आले, समाधान वाटलं, बरं वाटलं. उद्धवजी मातोश्रीबाहेर पडू शकतात, हा संदेश त्यांनी काल दिला. मागच्या अडीच वर्षात जर बाहेर पडले असते तर शिवसेनेचे दोन भाग झाले नसते.
उद्धवजी आमचे मुख्यमंत्री होते, पण कोकणावर संकटं आली तेव्हा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बाहेर पडले नव्हते,’ असा टोला रामदास कदम यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं असतं तर आज महाराष्ट्राच्या जनतेला समाधान वाटलं असतं. उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत आहेत. मला वाटतं आता अजितदादांनी विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा दिला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते पद घेतलं तर ते चांगलं काम करू शकतात, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात ‘आम्ही त्यावेळी वाढवून मदत केली होती, त्यावेळी नीती आयोगासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर बैठक झाली होती. मी माझ्या घरी आणि पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी बसून होते. आम्ही घरी बसूनच काम केलं होतं. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. मी आणि पंतप्रधानांनी घरात बसूनच तेव्हा काम केलं होतं.
एनडीआरएफच्या निकशापेक्षा जास्त मदत दिली होती. हे निकष बदलले पाहिजेत,’ असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला. ‘आजची माझी भेट प्रतिकात्मक आहे, मी विरोधी पक्षात आहे म्हणून आलो नाही. एका बाजूला दिवाळी दुसरीकडे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे.
विचित्र अवस्थेमध्ये भेट होत आहे. कोरोना काळात शेतकरी राबला नसता तर आपलं दिवाळं निघालं असतं,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘पुण्यात पाऊस झाला, पण उपमुख्यमंत्री म्हणाले पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. आता इकडेही शेतात किती पाऊस पडावा हे ठरवता येत नाही, पण अस्मानी संकट आल्यावर शेतकऱ्यांना उघड्यावर सोडायचं नसतं,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला.