आम्ही ५० थराची सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली ; मुख्यमंत्री शिंदेचा उद्धव ठाकरेना टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात, मात्र आम्ही देखील ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून हे थर यापुढे असेच वाढत जातील असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली, स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी उपस्थित गोविंदांना घातली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘गोविंदाचा विमा पण दिला, प्रताप सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होती ती मान्य केली असून यापुढचे उत्सव जोरात साजरे करा, पण काळजी घेऊन करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले.
महाराष्ट्र गोविंदाचाही आहे .अपघात होऊ नये याची काळजी घ्या, प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच आनंद दिघेंनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे.
धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केलं, दिघेसोहेब बोलले होते की, ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांच्या बहिणीने सुद्धा हेच सांगितले होतं. त्यांची एवढी दूरदृष्टी होती आणि दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण केलं, या उत्सवात सहभागी झालो.
हे सर्वसामान्याचे सरकार आहे. आजचा उत्सव काळजी घेऊन साजरा करा, साथीचे आजार अजून गेले नाहीत काळजी घ्या. गणपती उत्सव देखील मोठया उत्सवात साजरा झाला पाहिजे. दोन वर्षे थांबलो मात्र आता सणांवरती कोणतेही निर्बंध लादले जाणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.
टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) हजेरी लावली होती. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदांशी संपूर्ण मराठीत संवाद साधला, ‘टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याचा मला अभिमान असल्याचे तिने सांगितले’. तसंच आपल्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा विशेष आनंद असल्याचे तिने सांगीतले.