गरिबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा , हेच भाजपचे धोरण :- नाना पटोले…..
पॉलिटिक स्पेशल लाईव्ह
नाशिक :- देशातील गरीब जनतेच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याबरोबरच दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन केंद्रातील भाजप सत्तेवर आला. परंतु आठ वर्षानंतरही ना वार्षिक दोन कोटी रोजगार उपलब्ध झाले ना गरिबांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा झाले.
श्रीमंताकडील संपत्तीचे गरीबांत वाटप हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते, परंतु सध्याच्या केंद्र सरकारचे गरिबांना लुटा अन श्रीमंतांना वाटा, हेच धोरण राहिल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत काँग्रेस पक्षातर्फे राज्यात आजादी गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे,त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.१२) पाथर्डी फाटा येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वसंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सेवादलाच्या कार्यकर्त्यांच्या संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
गंगाघाटावरील जुन्या भाजी बाजारच्या जागेवर सायंकाळी पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, सहप्रभारी ब्रिजकिशोर दत्त, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील, ज्येष्ठ नेते विजय राऊत, अभिजित राऊत, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, राजेंद्र बागूल, बबलू खैरे, मायाताई काळे, कैलास कडलग, अलमेश खान, स्वप्नील पाटील, राहुल दिवे, चारुशिला काळे, कल्पनाताई पांडे यांच्यासह विविध सेलचे प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय राऊत यांनी आभार मानले.
तिरंगा आमचा अभिमान
देशाचा तिरंगा ध्वज आमची शान, अभिमान आहे. सत्ताधारी भाजपकडून त्याला संपविण्याचा कट आहे. चीनने आक्रमण केले, तरी हे सरकार बोलायला तयार नाही. भाजप सरकारला तिरंगा कधीच मान्य नव्हता, असा आरोप श्री. पटोले यांनी यावेळी केला.
ताट वाजवू नको, अवदसा येते…
लहानपणी जेवणापूर्वी आपल्याला ताट वाजविण्याची सवय होती, परंतु एकदा आईने ताट वाजवत जाऊ नको, घरात अवदसा येते, असे सांगितले. तेव्हापासून ताट वाजविणे बंद केले, परंतु आपल्या पंतप्रधानांनी ताट वाजवून कोरोनारूपी अवदसा देशात घेतल्याचे आमदार पटोले यांनी सांगितले.