ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी सायंकाळी बसफेऱ्या सुरू करा ; अखिल भारतीय नौजवान सभेची पुसद आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पुसद हे शहर जिल्ह्यातील शिक्षणासाठी माहेरघर म्हणून ओळख असलेले शहर आहे. इथे पुसद तालुक्यातील सर्वच खेडे व आजूबाजूच्या तालुक्यांतून सुद्धा अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दररोज येजा करतात . खाजगी वाहतुकीचा खर्च परवडण्याजोगा नसल्याने विद्यार्थी बस पास चा उपभोग घेतात परंतु सकाळी गावावरून येण्याकरिता बस असल्या तरी सायंकाळी घरी परत जाण्याकरिता बस सेवा उपलब्ध नसल्याने किंवा बसच्या वेळा अनियमित असल्याने त्यांना नाईलाजाने खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावं लागतं परिणामी विद्यार्थ्यांना अतिरिक्त खर्च होतो तसेच खाजगी वाहन प्रवास सुरक्षित नसल्याने तो धोका सुध्दा पत्कारावा लागतो. परिवहन महामंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळणारी पास सोयीस्कर असली तरी सायंकाळी गावी परतण्यासाठी बसफेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येची दखल घेऊन अखिल भारतीय नौजवान सभा चे कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आज दि 28/07/2022 रोजी परिवहन महामंडळाच्या पुसद आगार प्रमुखांना निवेदन देऊन सायंकाळी पुसद व आजूबाजूच्या तालुक्यातुन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या नियमित सुरू कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आगार प्रमुख अभिजित कोरटकर साहेब यांनी कार्यकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून विद्यार्थ्यांची समस्या लवकरच सोडवली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय नौजवान सभा जिल्हासचिव निखिल टोपलेवार, तालुकाध्यक्ष समाधान बळी, विकास जाधव, प्रशांत खंदारे, राजु गायकवाड , सागर मुजमुले व तालुक्यातील अनेक विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.