ई-पिक पाहणी न करताही पीकविमा काढता येईल :- जिल्हाधिकारी ; पिक विमा काढण्यासाठी ई-पिक पाहणीची नोंद सक्तीची नाही ; ३१ जुलै पुर्वी काढा पिकविमा ; १ ऑगस्ट नंतर करा ई-पीक पाहणीची नोंद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. १७ :- पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पिक पाहणीची नोंद आवश्यक नसल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता 31 जुलै पुर्वी पिकविमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप २०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२२ असा आहे. तर शासनाच्या ई-पीक पाहणी मध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही ०१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होते.
नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणी मध्ये
केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र ०१ ऑगस्ट, २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणी मध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.