बकरी ईद सण शांततेत साजरा करावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन ; प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करा ; गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी ; जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 6 जुलै :- येत्या 10 जुलै रोजी येणारा बकरी ईद सण नागरिकांनी शांततेत साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अधिकृत कत्तलखाने कार्यरत नाहीत तसेच बकरी ईद सणाच्या निमीत्ताने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतुक करण्यात येते. याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाने जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे व यासाठी पशुधन विकास अधिकारी यांनी मुख्यालयात आपल्या चमुसह तत्पर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाने पोलीस विभागाच्या समन्वयाने जनावरांसाठी सुरक्षितता निर्माण करून जिल्ह्यात गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जनावरांची अवैध वाहतुक आढळल्यास तसेच प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याचे पालन न झाल्यास त्वरीत पोलीसांना सूचित करून कायदेशीर कारवाई करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षात प्राणिक्लेश प्रतिबंधक समीतीची बैठक काल घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त डॉ. एम. यु. गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. सविता राउत, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अक्षय सोळंकी, धिरज जाधव, संदीप गायकवाड, मुख्याधिकारी (बाभुळगाव) महेश जामनोर, अमोल माळकर (घाटंजी), नंदु परळकर अभिजीत वायकोस व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.